ज्येष्ठ समाजवादी नेत्या, मुंबईच्या विविध प्रश्नांवर चळवळी उभारून समाजात चैतन्य पेरणाऱ्या लढाऊ आंदोलक आणि माजी आमदार कमल देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने समाजवादी चळवळीतील एक ज्येष्ठ दुवा निखळला आहे. महिलांच्या प्रश्नांवर, विशेषत: पाणी आणि महागाईच्या समस्यांवर ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांच्या खांद्याला खांदा लावून कमलताईंनी केलेल्या आंदोलनांमुळे मुंबईच्या चळवळीच्या इतिहासास एक नवी दिशा मिळाली होती. लाटणे मोर्चा आणि हंडा मोर्चाद्वारे सामान्य घरांतील महिलांचा भक्कम आवाज त्यांनी मृणालताईंसोबत मंत्रालयात घुमविला.

महागाई प्रतिकार संयुक्त समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्याशी वाढत्या महागाईबाबत चर्चा करण्यासाठी सातत्याने वेळ मागितली, पण अंतुले यांनी प्रत्येक वेळी भेट न देता त्यांना ताटकळत ठेवले. अखेर मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर महिलांचा ताफा घुसला आणि त्यांनी जोरदार घोषणांनी मंत्रालय दणाणून सोडले. यामध्ये अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, कमल देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी फरफटत खाली नेण्याचा प्रयत्न सुरू केला. ३२ महिला निदर्शकांना अटक करण्यात आली. त्यांना जामीन मिळाला नाही, उलट त्यांच्यावर खटला गुदरण्यात आला. अहिल्याताई, मृणालताई आणि कमलताई यांना उभा महाराष्ट्र रणरागिणी म्हणून ओळखू लागला. अंतुले यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मृणालताई, प. बा. सामंत यांच्या साथीने त्यांनी थेट न्यायालयात खेचले आणि अखेर अंतुले यांनी मुख्यमंत्रिपद सोडले.

mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
Kapil Patil met Raj Thackeray,
भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील यांच्याकडून मनसेचे राज ठाकरे यांची भेट
Sunetra Pawar
रायगड : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला…
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले

माजी आमदार प. बा. सामंत यांनी मृणाल गोरे, कमल देसाई यांच्यासोबत नागरी निवारा परिषदेची स्थापना केली. सामान्यांना परवडेल अशा घरांची योजना त्यांनी राबविली. सामंत यांनी मृणाल गोरे व कमल देसाई यांच्यासह कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत सामान्यांना जमीन मिळावी म्हणून लढा सुरू केला होता. त्यामुळे त्यांचे सामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जडले.  जॉर्ज फर्नाडिस यांनी पुकारलेला रेल्वे संप यशस्वी करण्यासाठी कमलताई पदर खोचून रस्त्यावर उतरल्या होत्या. सामान्यांच्या प्रश्नांवर जनतेचा लढा उभारण्यासाठी त्या एकाकीपणे मेगाफोन घेऊन रस्त्यावर उतरत असत आणि कमलताई आंदोलनात उतरताच बघता बघता महिला व कष्टकरी जनता त्यांच्यासोबत जमा होऊन सरकारच्या उरात धडकी भरविणारे आंदोलन छेडत असत. त्यांच्या निधनाने एका धगधगत्या पर्वाचा अस्त झाला आहे.