ठाणे : ठाणे शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि चौकात उभारण्यात आलेल्या एकूण १९५ जाहिरात फलकांपैकी १३९ जाहीरात फलक कंपन्यांनी फलकाच्या लोखंडी सांगाड्याचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केले आहे. उर्वरित ५६ जाहीरात फलक कंपन्यांनी अद्यापही स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केले नसून प्रमाणपत्र सादर करण्यास टाळाटाळ करत असलेल्या या कंपन्यांच्या जाहिरात फलकांवर सोमवारपासून कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून वादळीवाऱ्यासह पाऊस होत आहे. या पावसादरम्यान शहरातील वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच जाहीरात फलक पडण्याचे प्रकार घडतात. काही वेळेस जाहीरात फलकाचा पत्राही उडून खाली पडतो. गेल्यावर्षी मुंबई येथील घाटकोपर भागात जाहिरात फलक कोसळून झालेल्या अपघातात काही नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. या घटनेनंतर राज्यातील सर्वच शहरांप्रमाणे ठाणे शहरातील जाहीरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर येताच, पालिकेने महत्वाचा निर्णय घेतला होता. यानुसार फलकांच्या लोखंडी सांगाड्याचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पालिकेने दिल्यानंतर जाहिरात कंपन्यांनी त्यांची पुर्तता केली होती. यंदाच्या पावसाळ्यातही शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि चौकात उभारण्यात आलेले जाहीरात फलक कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने असेच निर्देश दिले होते. त्यासाठी जाहीरात फलक कंपनी मालकांना प्रशासनाने नोटीसा बजावून २५ मे पर्यंत फलकाच्या लोखंडी सांगाड्याचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. यानंतरही पुन्हा मुदत वाढ दिली होती. या मुदतीत एकूण १९५ जाहिरात फलकांपैकी १३९ जाहीरात फलक कंपन्यांनी फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केले आहे. उर्वरित ५६ जाहीरात फलक कंपन्यांनी अद्यापही स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केले नाही, अशी माहिती पुढे आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत १९५ अधिकृत जाहीरात फलक आहेत. गेल्यावर्षी अनेक जाहीरात कंपनी मालकांनी पालिकेच्या नोटीसनंतर दोन ते पाच वर्षांचे जाहीरात फलक सांगड्याचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, या सर्वांना पालिकेने पुन्हा नव्याने स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. अद्यापही ५६ फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेला प्राप्त झालेले नसून त्यांच्याकडून सोमवारपर्यंत प्रमाणपत्र येण्याची वाट पाहिली जाणार आहे. त्यानंतरही आले नाही तर, जाहिरात फलकांवर कारवाई केली जाणार आहे.
ज्या जाहिरात फलक कंपन्यांकडून स्थैर्यता प्रमाणपत्र सादर होणार नाही, त्यांच्या फलकावरील जाहिरात काढून टाकण्याची कारवाई सोमवारपासून हाती घेतली जाणार आहे. त्यानंतरही प्रमाणपत्र आले नाही तर, पुढील नियमानुसार कारवाई केली जाईल. दशरथ वाघमारे सहाय्यक आयुक्त, ठाणे महापालिका