कल्याण – कल्याण शहर परिसरातील ५८ नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांना पर्यटनासाठी थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जातो असे आश्वास्त करून या पर्यटकांकडून पर्यटनाचे सात लाख ४६ हजार ५०० रूपये भरणा करून घेतले. त्यानंतर दिलेल्या तारखेच्या दिवशी पर्यटनासाठी घेऊन न जाता ५८ पर्यटकांची पर्यटन कंपनीच्या नाशिक येथील एकाच कुटुंबातील वडील, मुलगा आणि त्याची पत्नी या संचालकांंननी आर्थिक फसवणूक केली आहे.
पर्यटनासाठी घेऊन जात नसल्याने आपण आमचे घेतलेले पैसे परत करा म्हणून ५७ पर्यटकांनी पर्यटन कंपनी संचालकांच्या पाठीमागे तगादा लावला. परंतु, संचालकांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पर्यटन कंपनीच्या संचालकांनी आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यावर ५७ पर्यटकांच्या पुढाकाराने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. एका सेवानिवृत्त महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा शुक्रवारी दाखल करून घेतला आहे.
कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावर रामबाग गल्लीमध्ये या पर्यटन कंपनीचे कार्यालय आहे. या पर्यटन कंपनीचे तीन संचालक नाशिक येथे उपप्रादेशिक कार्यालयामधील परिसरात वासंती व्यापारी संकुल भागात राहते. या प्रकरणात फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आम्ही एकूण ५७ पर्यटक आमच्या नातेवाईकांसह सिमला, अंदमान, निकोबार, सिंगापूर येथे फिरण्यासाठी जाणार होतो. यासंदर्भात आम्ही कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील नाशिक येथील पर्यटन कंपनीची शाखा असलेल्या कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी तेथील संचालकांनी आम्हाला आपण प्रस्तावित केलेल्या प्रदेशात पर्यटनासाठी घेऊन जातो असे आश्वास्त केले. या आश्वासनावर विश्वास ठेऊन पर्यटकांनी पर्यटन कंपनीच्या संचालकांनी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यावर सात लाख ४६ हजार ५०० रूपयांचा भरणा करण्यास सांगितला. तसेच, पर्यटनाच्यावेळी बस प्रवासाठी एक लाख रूपये भरणा करण्यास पर्यटकांना सांगितले.
पर्यटनाची तारीख जवळ आल्यावर पर्यटकांनी सिमला, अंदमान, निकोबार, सिंगापूर येथे जाण्याची तयारी केली. पर्यटकांनी पर्यटन कंंपनीकडे पर्यटनाला निघण्याच्या वेळेबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांना धक्का बसला. पर्यटनाच्या ठरलेल्या तारखेस पर्यटकांना घेऊन जाण्यास पर्यटन कंपनीने असमर्थता व्यक्त केली. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. पर्यटनासाठी घेऊन जाणार नसाल तर आमचे भरणा केलेले पैसे परत करा असा तगादा पर्यटकांनी पर्यटन कंपनी संचालकांच्या मागे लावला. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर फसवणूक झालेल्या पर्यटकांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात पर्यटन कंपनी संचालकांविरुध्द आर्थिक फसवणुकीची तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा माळी तपास करत आहेत.