ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे भव्य भगवा ध्वज उभारण्यात आला असून या शिवध्वजाचे अनावरण शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि पुरोगामित्वाचा जागर असल्याची प्रतिक्रियाही आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केली. इथे उभारलेला भगवा हा कोण्या पक्षाची नाही तर मराठी अस्मितेची, त्यागाची आणि शौर्याची निशाणी आहे, असेही ते म्हणाले.

कळवा पूर्व येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा तसेच विचारांचा जागर व्हावा, या उद्देशाने भव्य शिवध्वज उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने सुमारे ५२ फूट उंचीच्या लोहस्तंभावर २०×३० फूट आकारमानाचा शिवध्वज फडकत ठेवण्याची संकल्पना डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या शिवध्वजाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आजच्याच दिवशी जगात सर्वात आधी रयतेचे राज्य स्थापन झाले. या देशात जुलमी राजवटीविरुद्ध प्रथमच बंड करून मराठी अस्मिता जगाला दाखवून देणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून आपला राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांडाला दूर सारले होते. कर्मकांड नाकारून शिवरायांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व जगासमोर मांडले होते.

विकासाचा टेंभा कुणी मिरवू नका

व्हिएतनामसारख्या छोट्याशा देशाने अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेला नमविले. या व्हिएतनामनेही आपल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांचाच आदर्श समोर ठेवला होता आणि त्याची कबुली आजही ते देत आहेत. महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेच्या राज्याला नख लावण्याचे काम खंडोजी खोपडे, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केले. मात्र, त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. इतिहास सुभेदार तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते आणि जीवाजी महाले यांचा लिहिला गेला. आपण या शूरवीरांचे वारस आहोत. गद्दारांना या मातीत ठेचल्याशिवाय हा महाराष्ट्र कधी शांत बसलेला नाही. गद्दारी करणारे लोक विकासासाठी नाही स्वयंविकासासाठी गेले आहेत. त्यामुळे विकासाचा टेंभा कुणी मिरवू नका. इथे दिसणारा विकास १५ वर्षांच्या मेहनतीचा परिणाम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवध्वज अनावरण करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या पुढाकारातून दुचाकीची शिवरॅली काढण्यात आली. कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरूवात करण्यात आली. या रॅलीत शेकडो शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवाच्या घोषणा देत ही रॅली कळवा नाका, कळवा परिसर अशी फिरून छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे विसर्जित करण्यात आली.