कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, दिवा शहरांचे झपाट्याने नागरीकरण होत आहेत. या वाढत्या वस्तीचा संपूर्ण भार परिसरातील रस्ते, रेल्वे स्थानकांवर येत आहे. या वस्तीत राहणारा बहुतांशी वर्ग हा मुंबई, नवी मुंबई भागात नोकरी करणारा आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील वाढत्या गर्दीचा विचार करून शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या वेळा बदलण्याच्या हालचाली राज्य शासनाने सुरू केल्या होत्या. रेल्वेनेही तशी मागणी शासनाकडे केली होती. परंतु, या महत्वपूर्ण विषयावर शासन उदासीन असल्याने प्रवाशांचे रेल्वे अपघातात हकनाक बळी जात आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी दिली.

डोंबिवली जवळील शिळफाटा भागात नवीन गृहसंकुले उभी राहत आहेत. जुळी डोंबिवली म्हणून हा भाग ओळखला जाऊ लागला. शिळफाटा परिसरात २० वर्षापूर्वी नवीन गृहसंकुले उभी राहू लागली. त्यावेळी विकासकांनी दिवा-पनवेल मार्गावर दिवा परिसरात आगासन रेल्वे स्थानकाची उभारणी होणार असल्याचे आश्वासन रहिवाशांना दिले होते. वस्ती वाढली तरी आगासन रेल्वे स्थानकाचा अद्याप का विचार केला जात आहे. आश्वासने देणारे आता अधिकारी पदावर आहेत. निळजे, आगासन ही रेल्वे स्थानके पूर्ण क्षमतेने सुरू केली, या भागातून ठाण्यापर्यंत शटल सेवा सुरू केली तरी डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकांवर येणारा प्रवासी गर्दीचा भार कमी होणार आहे, असे अध्यक्षा अरगडे यांनी सांगितले.

शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे ठाणे येथून रेल्वेने नवी मुंबई परिसरात जाणारा प्रवासी वर्ग वाढला आहे. दिवा शहराची लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे यापूर्वीच्या प्रवासी संख्येत अनेक पटीने वाढ झाली आहे. आता लोकल कितीही वाढविल्या तरी या गर्दीचे एकाचवेळी विभाजन करणे शक्य नाही. यासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील शासकीय, निम शासकीय कार्यालयांच्या वेळा बदलणे गरजेचे आहे. शासनाने अशाप्रकारे वेळा बदलण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. पण नंतर त्याचे पुढे काहीच झाले नाही. फक्त मुंबई परिसरात रेल्वे मार्गावर एखादी दुर्घटना घडली की शासन, रेल्वेला त्यावेळी उपाययोजनांची आठवण होते. त्यानंतर या सर्व गोष्टी विसरल्या जातात, असे अरगडे यांनी सांगितले.
कल्याण ते ठाणे दरम्यानचे वाढते रेल्वे अपघात विषयावर चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठांकडे अनेकदा वेळा मागितल्या. जनसंपर्क अधिकाऱ्यांना संपर्क साधला. ही अधिकारी मंडळी रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दाद देत नाहीत. अशा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करणे आवश्यक आहे. बहुतांशी वरिष्ठ रेल्वे अधिकारी बाहेरच्या प्रांतामधील असतात. त्यामुळे स्थानिक रेल्वे समस्यांविषयी ते फार गंभीर नसतात, असाही अनुभव आहे, असे अरगडे यांनी सांगितले. प्रवाशांचे हकनाक बळी थांबवायचे असतील तर मुंंबईतील कार्यालयाच्या वेळा बदलणे हा मुख्य उपाय आहे. कसारा, कसारा दूरवरून येणाऱ्या नोकरदारांसाठी सकाळच्या वेळा, मुंबई शहर परिसरातील नोकरदारांसाठी उशिराच्या वेळा ठेवल्या तरी लोकल गर्दीचा विषय मार्गी लागू शकतो. या अध्यक्षा अरगडे यांनी सांगितले.