ठाणे : गेली १५ ते २० वर्षांपासून आरोग्य व्यवस्थेचा कणा बनून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या उदासीनतेविरोधात सोमवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहा बाहेर आंदोलन केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान एकीकरण समितीच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले होते. यात, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हजारोच्या संख्येने कर्मचारी कंत्राची पद्धतीने आरोग्य व्यवस्थेत गेले १५ ते २० वर्षांपासून काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना हक्काचे स्थान आणि सन्मान द्यावा अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकीकरण समितीने केली आहे. तसेच उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या निकालाची अंमलबजावणी करावी, १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे समायोजन तत्काळ करण्यात यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात १०% वाढ करावी, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे ५% वार्षिक वाढ लागू करावी, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसाठी एकवेळ बदली धोरण लागू करावे, सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण आणि भविष्य निर्वाह निधी योजना लागू कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे राज्य समन्वयक मनीष खैरनार यांनी दिली.
या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी, नेमकी कार्यवाही होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपली लढाई थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन निर्णय घेतला नाही तर, राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. समितीचे मनीष खैरनार, जयवंत विशे, प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.