डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सुरू केलेली चळवळ गतिमान करण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी प्रयत्न करावेत, असे मत प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी व्यक्त केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीड येथे जयभीम महोत्सव सुरू आहे. महोत्सवात ‘अष्टपैलू डॉ. आंबेडकर’ या विषयावर डॉ. कांबळे यांचे व्याख्यान झाले. प्रा. वसंत गायकवाड, अजय सवाई, अॅड. सुमारे वडमारे आदी उपस्थित होते. प्रा. कांबळे म्हणाले की, आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचे आहे, हे नवीन पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. नव्या पिढीवर चांगले संस्कार झाले, तर देशाच्या विकासात भर पडेल. डॉ. आंबेडकर आदर्श विद्यार्थी होते. पोटाला पीळ देऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले. कोलंबो विद्यापीठाच्या शंभर आदर्श विद्यार्थ्यांपैकी पहिले नाव डॉ. आंबेडकर यांचे होते. डॉ. आंबेडकर इतिहासतज्ज्ञ, संशोधक, उत्कृष्ट पत्रकार, शिक्षण संस्थाचालक होते. त्यांनी आयुष्यात ३२ हजार पुस्तकांचे वाचन केले. पुढे जाण्यासाठी समाजातील प्रत्येकाने त्यांचे वाङ्मय वाचणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन अॅड. राहुल मस्के यांनी केले. महादेव इनकर यांनी आभार मानले.