शेतकऱ्यांनी पीक उत्पादन व विक्रीयोग्य शिलकी उत्पादनाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन एसबीआयचे क्षेत्रीय सहायक सरव्यवस्थापक आर. एस. लोटे यांनी केले.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, पुणे जिल्हा कार्यालय लातूरद्वारा केंद्र सरकारच्या कृषी पणन आधारभूत संरचना, प्रतवारीकरण व प्रमाणीकरण योजनेवर एकदिवसीय जाणीव-जागृती कार्यक्रम घेण्यात आला, त्या वेळी लोटे बोलत होते. एमजीबीचे क्षेत्रीय व्यवस्थापक पी. के. लाड, शिखर बँकेचे व्यवस्थापक आर. सी. कुलकर्णी, एस. बी. पाचिपडे आदी उपस्थित होते. लोटे म्हणाले, की शेतीतून मिळणारे उत्पादन शेतकरी बाजारात विकतो. परंतु हे उत्पादन प्रतवारीकरण व प्रमाणीकरण करून विकल्यास त्याला अधिक भाव मिळू शकतो. त्यामुळे शेतीमालाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. प्रतवारीकरण व प्रमाणीकरण यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात गुणवत्ता निर्माण होते, तसेच उत्पादनात वाढही होते. त्यामुळे या योजनेच्या आवश्यक बाबींची पूर्तता करून आपला विकास साधणे गरजेचे आहे. जिल्हा विकास प्रबंधक एस. बी. पाचिपडे यांनी प्रास्ताविक, प्रा. संजय गवई यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर सायगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास उद्योजक, शेतकरी उपस्थित होते.