हे दिवस नवीन रोपं तयार करण्यासाठी अतिशय उत्तम असतात, त्यामुळे याच दिवसांत आपल्याला  फुलझाडांची रोपं मोठ्या प्रमाणात तयार करून ठेवता येतील. यात बोगनवेलीच्या छोट्या फांद्या मिळवून त्या कुंड्यांमध्ये लावून रोपं तयार करणं सहज शक्य आहे. बोगनवेल ही अनेक रंगात फुलते. तिचं रंगवैविध्य थक्क करणारं असतं. आपल्या आवडीच्या रंगाची निवड करून त्या- त्या झाडाच्या अगदी छोट्यातल्या छोट्या फांदी पासून आपण नवीन रोपं तयार करू शकतो.

सध्या पावसाने चांगलाच जोर पकडलाय. अगदी मे महिन्यापासून तो पडतोय, त्यामुळे अनेकांची  उन्हाळ्यात करायची वाळवणांची, बेगमीची कामं राहून गेली आहेत. बागप्रेमींसाठीसुद्धा उन्हाळा फार महत्त्वाचा असतो. पावसाळी भाज्यांची तयारी, फुलझाडं लावणं, कुंड्या बदलणं, माती मोकळी करून तिला उन दाखवणं. तयार कंपोस्ट खत चाळून प्रतवारी करून साठवून ठेवणं ही सगळी कामं करायचे हेच तर दिवस, पण नेमका पाऊस याच दिवसांत आल्यामुळे ही सगळी कामं राहिलीच. आता जून संपत आलाय. पावसाचा जोर वाढतोय. अशावेळी बागेत काय काय नवीन प्रयोग करता येतील त्याबद्दल जाणून घेऊया.

हे दिवस नवीन रोपं तयार करण्यासाठी अतिशय उत्तम असतात, त्यामुळे याच दिवसांत आपल्याला  फुलझाडांची रोपं मोठ्या प्रमाणात तयार करून ठेवता येतील. यात बोगनवेलीच्या छोट्या फांद्या मिळवून त्या कुंड्यांमध्ये लावून रोपं तयार करणं सहज शक्य आहे. बोगनवेल ही अनेक रंगात फुलते. तिचं रंगवैविध्य थक्क करणारं असतं. आपल्या आवडीच्या रंगाची निवड करून त्या- त्या झाडाच्या अगदी छोट्यातल्या छोट्या फांदी पासून आपण नवीन रोपं तयार करू शकतो. जाई, मोगरा यांची रोपेही याच दिवसांत तयार करायची. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जास्वंद. जास्वंद औषधी तर आहेच, पण देवपूजेच्या फुलांसाठी तसेच शोभेसाठीही आपल्या बागेत ती हवीच.

लाल, पिवळी, नारिंगी, गुलाबी असे विविध रंग जास्वंदीमध्ये बघायला मिळतात. एकदा फार सुंदर अशा लवेंडर रंगाचं जास्वंदींचं फूल मी वाईला पाहिलं. मोहक रंग त्यावर नाजूक लालसर नारिंगी रेषा. नजर ढळत नव्हती त्या फुलावरून. ते झाडही बऱ्यापैकी मोठं आणि उत्तम वाढ झालेलं होतं, त्यामुळे त्याच्या काही फांद्या कापून घेता आल्या. पुढे मी त्यापासून बरीच रोपं केली.

पावसाळ्यात फांदीपासून जास्वंदीचं रोपं तयार करणं जास्त सोपं पडतं. एरवी वर्षभर रोपं तयार करताना खूप काळजी घ्यावी लागते. बरेच वेळा जलद मूळ धरण्यासाठी रूटींग मिक्श्चरचाही वापर करावा लागतो, पण पावसाळ्यात मात्र ही सगळी कामं विनासायास होतात. मुळातच हे सृष्टीच्या सृजनाचे महिने असल्यामुळे वनस्पतींच्या सृजनाचे सगळे प्रयत्न फलद्रूप होतात.

हेही वाचा

जास्वंदीबरोबरच संक्रांत वेल, गणेश वेल, वेली मोगरा, सायली, कागडा, जाई-जुई यांसारख्या नाजूक वेलींची लागवड आणि रोपं तयार करणं हे काम ही याच दिवसात साध्य होतं. सोनटक्याच्या फुलांमध्येही खूप छान रंग बघायला मिळतात. पांढरा, पिवळा क्वचित लालसर गुलाबी सोनटक्का ही पाहायला मिळतो.

याचे कंद जर जूनमध्ये लावले तर पुढच्या पाच एक महिन्यात याला चांगली फुले येतात.

या दिवसांत पावसाचं पाडणारं पाणी हे झाडांना फार उपयोगी ठरतं. त्यांची वाढ झपाट्याने होते,म्हणून अधिक कल्पकता वापरून वर्षभर जी म्हणून झाडं आपल्याला लावायची असतील त्यांची तयारी याचं दिवसात करावी. चाफा, कांचन, प्राजक्त, बेल हे वृक्ष तर  तगर, अनंत, कण्हेर यांसारख्या झुडुप वर्गीय झाडांची रोपेसुद्धा याच दिवसांत तयार करणं सोयीचं. शोभेची आणि देवपूजेला लागणाऱ्या झाडांबरोबरच पाऊस काळात लावायच्या भाज्यांचीसुद्धा तयारी करावी.

 मागील वर्षी उन्हाळ्यात बहर येऊन संपलेल्या जुन्या रोपांच्या जागी आता नवीन लागवड करायची तर त्यासाठी आधी माती मोकळी करून त्यात पुरेसं शेणखत किंवा गांडूळखत असल्यास किंवा मिळाल्यास थोडी चुलीतली राख घालून कुंडी भरून घ्यायची. घोसाळी, दोडकी, कारली, दुधी भोपळा, पडवळ, लाल भोपळा, तवशी काकडी, साधी काकडी या वेलवर्गीय फळभाज्या पावसाळ्यात उत्तम होतात. शिवाय सणावाराला नैवैद्या साठीही त्या लागतात. तेव्हा त्यांच्या बिया लावून आधारासाठी छोटा मांडव घालून घ्यायचा. गच्चीवर जर तुम्ही लागवड करत असाल तर आधी छोटा आणि मग वाढीनुसार मोठा मांडव घालावा लागतो. जमिनीवरची लागवड त्यामानाने सोपी असते.

घोसाळी, दोडकी, कारली एकदा लावली की जवळ जवळ वर्षभर भाजी मिळत राहते. भोपळ्याच्या वेलाची पानं आणि फुलं भाजीसाठी वापरतात येतात, त्यामुळे सुरुवातीला येणारी नर फुलं, अतिरिक्त पानं जी वेल मजबूत व्हावी म्हणून आपण खुडून टाकतो त्याचाही आपण उपयोग करू शकतो.

याशिवाय हळदीचे कंद, अळू, रताळी, कणगर, गराडू, आलं यांची लागवड याच काळात करायची. बियांपासून कढीपत्त्याची रोपं करण्यासाठी हा काळ उत्तम असतो. या दिवसांत बिया फार लवकर रूजतात आणि चार एक महिन्यात एक जोमदार झाडं तयार होतं आणि घरापुरती ताजी कढीपत्त्याची पानं मिळू लागतात.

कोथिंबीर, पुदीना यांसारख्या  स्वयंपाकघरात उपयोगी घटकांची लागवड करताना आडोसा बघावा लागतो. कारण पावसाच्या माराने कोथिंबीर मान टाकते. पुदिना खराब होतो. अशावेळी गरजेपुरतीच त्यांची लागवड करावी. मिरचीची रोपं आणि आल्याचे कंद मात्र जोमाने वाढतात. पालेभाजी खरंतर पावसाळ्यात फारशी खाल्ली जात नाही, पण जर तुम्ही कुंडीत किंवा परसबागेत लावणार असाल तर मग घरच्या पालेभाजीचा उपयोग करता येऊ शकतो. मेथी, अळू, मायाळू, अंबाडी, घोळ, लाल माठ, हिरवा माठ अशा भाज्या पाऊस काळात उत्तम वाढतात. सोबत रताळ्याचा पालाही वापरता येईल. रताळी ही कंदवर्गीय भाजी याची पाने आणि कंदांचा असा दुहेरी उपयोग होतो. याशिवाय आपल्या कुंड्यांमध्ये इतर भाज्यांसोबत अनेक रानभाज्या आणि फळांच्या वृक्षांच्या बिया आपसूकच उगवून आलेल्या असतात.

त्या भाज्या कोणत्या आणि त्या कशा वापरायच्या याबाबत आणि त्या आगांतुक पाहुण्या फळं-झाडांविषयी जाणून घेऊया, पण पुढच्या लेखात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mythreye.kjkelkar@gmail.com