नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात ८ एप्रिल पर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत अधिवेशन चालणार आहे. तर दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिल पर्यंतचा असणार आहे. याशिवाय १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. याआधी सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षित संचालनसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष या दोघांनी सेक्रेटरी-जनरल यांना सद्य परिस्थितीत मागील हिवाळी अधिवेशनातील कोविड प्रोटोकॉलचा आढावा घेण्याचे आणि या संदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होत आहे. यामध्ये राष्ट्रपतींचे अभिभाषण होते आणि १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो. साधारणत: अर्थसंकल्पीय अधिवेशन मे महिन्यापर्यंत दोन टप्प्यांत चालते. राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प यावर चर्चा केली जाते आणि त्यानंतर सर्व पक्षांच्या मदतीने ते पारित केले जाते.