अमेठी लोकसभा मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार कुमार विश्वास यांची पत्नी, बहीण आणि इतर नातेवाईकांना अमेठी सोडून जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून धमकावल्याचा आरोप विश्वास यांनी केला आहे. तसे केले नाही, तर ‘आप’च्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येईल असेही सांगण्यात आले होते.
यानुसार कोणत्याही कारणाशिवाय येथील पोलिसांनी ‘आप’च्या काही कार्यकर्त्यांना काल रात्री अटक करण्यात आल्याचा आरोपही कुमार विश्वास यांनी केला आहे. ते म्हणतात, “काल रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांच्या गाड्या माझ्या घरासमोर आल्या आणि पोलिसांनी माझी पत्नी, बहीण आणि जवळचे नातेवाईक यांनी अमेठी सोडून जावे नाहीतर सर्वांना अटक करण्यात येईल अशी घोषणा माईकवरून केली केली. तसेच काही तासांनी ‘आप’च्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांचे सामानही फेकून देण्यात आले.” असल्याचा आरोप विश्वास यांनी केला आहे.
मात्र, अमेठीतील प्रचार संपला असल्यामुळे आचार संहितेच्या नियमांनुसार बिगर-नोंदणीकृत मतदार आणि उमेदवारांच्या समर्थकांना मतदान होईपर्यंत जिल्ह्या सोडावा लागेल यानुसारच आम्ही विश्वास यांच्या नातेवाईकांना तसेच कार्यकर्त्यांना अमेठी सोडण्यास सांगितले असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हटले आहे.