Why is it called Swargate : पुणे हे देशातील आणि राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. सांस्कृतिक शहर म्हणून या शहराची आगळीवेगळी ओळख आहे. या शहराला खूप मोठा इतिहास लाभला आहे. येथील प्रत्येक गोष्टीमागे, ठिकाणामागे एक रंजक इतिहास पाहायला मिळतो. आज आपण बसस्थानकामुळे सध्या लोकप्रिय असलेल्या पुण्यातील स्वारगेटविषयी जाणून घेणार आहोत. पुण्यात राहून स्वारगेट माहीत नाही, असा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. पण, तुम्ही कधी विचार केला का स्वारगेट हे नाव या ठिकाणाला कसे पडले? स्वारगेट या नावामागे कोणता इतिहास दडलाय? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

स्वारगेट हे नाव कसे पडले?

लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ‘नावामागे दडलंय काय?’ या पुस्तकात पुण्यातील विविध ठिकाणांच्या रंजक नावांमागचा इतिहास सांगितला आहे. या पुस्तकात त्यांनी स्वारगेट नावामागची गोष्ट सांगितली आहे. ते पुस्तकात सांगतात, “पुण्यात प्रवेश करण्यासाठीचा एक मार्ग येथून (आताच्या स्वारगेटवरून) जात असे. पुण्याची वस्ती वाढत होती, पेठा वसत होत्या, रस्ते बनत होते. पूर्वी गावाबाहेर संरक्षणासाठी गस्त ठेवली जात असे. त्यासाठी घोडेस्वार तैनात केलेले असत. अशा ठिकाणांना नाक्याचे ठिकाण किंवा पहारेकऱ्यांच्या चौक्या म्हणत असत. अशी ही महत्त्वपूर्ण ठिकाणे इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली. कारण- त्या ठिकाणांचे महत्त्व तसेच राहिले होते. इंग्रजांच्या अमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले आणि नाके किंवा चौकी, असे न राहता, त्याचे नाव ‘गेट’ असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेल्या नाक्याचे ठिकाण पुढे ‘स्वारगेट’ असे ओळखले जाऊ लागले. आजतागायत ते नाव तसेच राहिले आहे.”

KYC Fraud : केवायसी घोटाळा म्हणजे काय? फसवणूक होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी?

स्वारगेटला अनन्यसाधारण महत्त्व

लेखक सुप्रसाद पुराणिक सांगतात, “इ.स. १६६० साली शायिस्तेखान पुण्यात आला, तेव्हा त्याने कात्रज घाट उतरल्यावर पहिली मोठी गस्तीची चौकी स्वारगेट परिसरात उभारली होती. मोठ्या फौजफाट्यासह त्याने पुण्यात तळ ठोकला होता. जेव्हा सातारा ही राजधानी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वसवली होती तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी, जकात वसूल करण्यासाठीसुद्धा होत असे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज स्वारगेटने संपूर्ण शहराला जोडले आहे. लोकांची येथे भयानक गर्दी पाहायला मिळते; पण पूर्वीसारखा स्वारगेटचा दरारा आता संपला आहे. ज्या घोडेस्वारांमुळे या ठिकाणाला स्वारगेट नाव पडले, त्या घोडेस्वारांचे आता ठाणे उरलेले नाही आणि ना पहारेकऱ्यांच्या चौक्या. आज स्वारगेटला बसस्थानकामुळे फक्त लोकांची गजबज दिसून येते.