How AI is impacting For Jobs : मनोरंजनापासून वैद्यकीय उपचारांपर्यंत आणि शेअर बाजारापासून खासगी ते सरकारी प्रशासनापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे असंख्य नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. एआयचे फायदे आणि त्यासंबंधित धोके याविषयीच्या अनेक बातम्या आपण दररोज ऐकतो. सध्या भारतासह जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा गाजावाजा होत आहे. मात्र, हे तंत्रज्ञान जगाला एका अंधारमय भविष्याकडे घेऊन जाऊ शकतं. ‘एआय’मुळे मानवी अस्तित्वाच्या खुणा पुसल्या जाऊ शकतात आणि पृथ्वीवर केवळ १० कोटीच लोकसंख्या शिल्लक राहू शकते, असा इशारा अमेरिकेतील भारतीय वंशाचे संगणकशास्त्राचे प्राध्यापक सुभाष काक यांनी दिला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे? ते जाणून घेऊया…
एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाच्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे अनेक कामे झटपट होत असल्याने त्याचा वापर आजकाल प्रत्येक क्षेत्रात केला जातो. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनासाठी अत्यंत घातक ठरू शकते. जगभरातील अनेक लहान मोठ्या कंपन्यांमध्ये एआयचा वापर वाढल्याने न्यूयॉर्क आणि लंडनसारखी मोठी शहरे भविष्यात ओस पडलेली दिसून येऊ शकतात, असं ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीतील संगणकशास्त्राचे प्राध्यापक सुभाष काक यांनी म्हटलं आहे.
‘एआय’मुळे लोकसंख्या घटणार?
‘The Sun’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सुभाष काक म्हणाले, “पुढील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाऊ शकतो. परिणामी २३०० सालापर्यंत पृथ्वीवरील लोकसंख्या ८ अब्जांवरून केवळ १० कोटीवर येऊ शकते. एआय ही संकल्पना समाजासाठी अत्यंत विनाशकारी ठरण्याची शक्यता आहे. मला वाटतं की, लोकांना याची अजिबात कल्पना नसेल.” काक यांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्यामुळे बहुतेक लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. संगणक किंवा रोबोट ही मानवाने तयार केलेली उपकरणे आहेत. आपण त्यांना ज्या सूचना देतो, त्या सूचनांचे ते पालन करीत असतात. परंतु, भविष्यात या कामाचीही जागाही एआय घेऊ शकते. अगदी कार्यालयातील निर्णयही एआय मार्फतच घेतले जाऊ शकतात.

आणखी वाचा : Height Comparison : महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त उंचीचे का असतात? नवीन संशोधन काय सांगतं?
‘एआय’मुळे माणसांची गरज संपत चालली का?
सुभाष काक म्हणाले, “प्रत्येक प्रश्नाचं हव्या त्या स्वरूपातलं उत्तर देण्याची अचाट क्षमता घेऊन चॅट-जीपीटी आपल्या सेवेत दाखल झालं आहे. आजकाल कोणतंही काम अडलं की, त्या अडचणीला पर्याय म्हणून अनेकजण चॅट-जीपीटीकडे वळतात. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून तयार केलेल्या या प्रणालीवर कायदा, शिक्षण, आरोग्यविषयक प्रश्न, वैद्यकीय सल्ले तसेच वैयक्तिक नातेसंबंध यासारखे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या क्षेत्रात असलेल्या माणसांची गरज संपत चालली आहे. पुढील काही वर्षात ‘एआय’चा वापर सर्वच क्षेत्रात होणार असल्याने याचा तीव्र परिणाम मानवी जन्मदरावर होऊ शकतो. कारण, बेरोजगारी वाढल्याने लोक मुलांना जन्माला घालण्यास इच्छुकच नसतील.”
‘एआय’मुळे पृथ्वीवरील लोकसंख्या १० कोटींवर येणार?
- सुभाष काक यांच्या मते, जर नवीन पिढ्या जन्माला येणं थांबलं, तर जगातील लोकसंख्या झपाट्याने कमी होऊ शकते.
- काही लोकसंख्याशास्त्रज्ञ असा इशारा देत आहेत की, २३०० सालापर्यंत पृथ्वीवरील लोकसंख्या १० कोटींवर येऊ शकते.
- जर असं घडलं, तर लंडन आणि न्यूयॉर्कसारखी मोठमोठी शहरे देखील ओसाड पडू शकतात, असं काक यांनी म्हटलं आहे.
- “माझ्या पुस्तकात यासंबंधी सर्व डेटा उपलब्ध आहे. हे फक्त माझं एकट्याचं मत नाही,” असं काक यांनी ‘The Sun’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
- लोकांनी मुलं होऊ देणं थांबवलं आहे. युरोप, चीन, जपान आणि कोरिया यांसारख्या देशांमध्ये लोकसंख्या सर्वात वेगाने घटत आहे, असं उदाहरणही काक यांनी दिलं.
- ते म्हणाले की, मी असं म्हणत नाही की, ही परिस्थिती कायम राहील, पण त्यांना मागे फिरवणे खूपच कठीण आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी जन्मदराच्या घटत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानाचा संदर्भही काक यांनी यावेळी दिला. ते म्हणाले, “एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की, माणसांनी कदाचित अंतराळात जावं, कुठेतरी दुसरीकडे वसाहती उभाराव्यात, जेणेकरून अशा कोणत्याही शोकांतिका घडल्यास मानवजातीला पुन्हा पृथ्वीवर आपलं साम्राज्य उभं करता येईल.”
कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) प्रगती कशी झाली?
गेल्या काही वर्षात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक क्षेत्रात झपाट्याने प्रगती झाली आहे. २०२२ मध्ये ChatGPT सारखी साधने पुढे आल्यानंतर आता व्यवसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहेत. मात्र, या वेगवान प्रगतीमुळे भविष्यातील रोजगारासंदर्भात नवीन चिंता निर्माण झाल्या आहेत. मार्च महिन्यात, ब्रिटनच्या चान्सेलर रॅचेल रीव्ह्स यांनी सांगितलं होतं की, एआय अधिकाधिक भूमिका स्वतःकडे घेत आहे. त्याचवेळी, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित कौशल्यांची मागणीही झपाट्याने वाढत आहे. ‘The Wall Street Journal’ मधील एका सर्व्हेनुसार, ८७ टक्के भरती व्यवस्थापक आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या उमेदवारांचा शोध घेत आहेत. प्रत्येक चारपैकी एका नोकरीच्या जाहिरातीत एआय कौशल्य असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जात आहे.
हेही वाचा : Raigad astrolabe: रायगडाच्या बांधकामाचे खगोलशास्त्रीय गूढ उलगडले; काय आहे हे ‘यंत्रराज’?
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या धोक्यात येतील का?
एप्रिलमध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषद (UNCTAD) ने असा अंदाज व्यक्त केला की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगभरातील सुमारे ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. एआयमुळे काही कंपन्या त्यांच्या कामाचे स्वरुप बदलतील तर काही पूर्णपणे नाहीशा होतील, ज्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या नोकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ‘SignalFire’ या व्हेंचर कॅपिटल कंपनीच्या आकडेवारीनुसार, २०१९ पासून मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये एंट्री-लेव्हल भरती ५० टक्यांपेक्षा कमी झाली आहे. पूर्वी नवीन पदवीधरांमध्ये १५ टक्के उमेदवारांची भरती होत होती. मात्र, आता ही आकडेवारी फक्त ७ टक्यावर आली आहे.
मार्क झुकरबर्ग यांनी काय म्हटलं होतं?
फेसबुकचे संस्थापक व मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडे असं म्हटलं होतं की, त्यांच्या कंपनीतील एआय प्रणाली आता मध्यम दर्जाच्या सॉफ्टवेअर पातळीवर काम करीत आहे. दरम्यान, कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे झालेला हा बदल आता मानवी रोजगारासह अर्थव्यवस्थेवर परिणाम करीत आहे. काही दिवसांपूर्वी आयबीएम कंपनीने सुमारे कर्मचाऱ्यांना कामावरून कामावरून काढून टाकलं होतं. यातील बरेच कर्मचारी हे मानव संसाधन (HR) विभागात काम करीत होते. अहवालानुसार, एआय आता अशा जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, ज्या पूर्वी माणसं हाताळत होती. एकीकडे कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे नोकऱ्या कमी होत असल्या तरी एका अहवालात असं नमदू करण्यात आलंय की, यामुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत.