पहिल्याच पावसात कोकणात मुंबई-गोवा महामार्ग चिखलात गेला. रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे कोकणातील दोन्ही प्रमुख वाहतूक व्यवस्था बाधित झाल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की कोकणातील दळणवळण बेभरवशाचे होतात. यामागच्या कारणांचा थोडक्यात आढावा..
मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती कशी?
कोकणात नैर्ऋत्य मोसमी वारे यंदा दहा दिवस आधीच दाखल झाले. त्यामुळे मे महिन्याच्या उत्तरार्धात कोकणात मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सरासरी पाचशे मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. तर रायगड जिल्ह्यात सरासरी साडेतीनशे मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाल्याचे पाहायला मिळाले. रायगड जिल्ह्यात लोणेरे, कोलाड परिसरात तर रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर ते हातखंबा दरम्यान महामार्ग चिखलात गेल्याचे दिसून आले. या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य परसरले होते. त्यामुळे वाहनचालकांना या महामार्गावरून गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत होती.
कोकण रेल्वेची परिस्थिती कशी?
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा फटका कोकण रेल्वेला बसला. कोकण रेल्वे मार्गावर २० मे रोजी लांजा तालुक्यातील वेरवली ते विलवडे रेल्वे स्थानकांदरम्यान संध्याकाळी दरड कोसळली. त्यामुळे कोकण रेल्वे सेवा विस्कळीत झाली. प्रशासनाने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वे मार्ग मोकळा केला. या दरड दुर्घटनेमुळे अनेक गाड्या दुसऱ्या दिवशीही एक ते दीड तासांच्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे पहिल्याच पावसात कोकण रेल्वे सेवेचा बोजवारा उडाला होता. रस्ते वाहतुकीपाठोपाठ रेल्वे सेवा अतिवृष्टीमुळे बाधित झाली होती.
कारणे कोणती?
कोकणातील दळणवळणाची साधने पावसाळ्यात बाधित होण्याची ही पहिली वेळ नाही. जवळपास दरवर्षी याच परिस्थितीला कोकणवासियांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोकणातील दळणवळणाची साधने पावसाळ्यात बेभरवशाची ठरत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला २०११ मध्ये सुरुवात झाली. तर दुसऱ्या टप्प्यातील कामाला २०१४ मध्ये सुरुवात झाली. ही कामे दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२५ चे अर्ध वर्ष सरत आले तरी कामे पूर्ण झाली नाहीत. भूसंपादनास झालेला उशीर, पर्यावरण विभागाच्या परवानगीला झालेला उशीर, ठेकेदारांची निष्क्रियता आणि अवजड वाहतूक आणि अतिवृष्टी हे प्रमुख घटक आहेत. अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रेल्वे सेवेलाही पावसाचा दरवर्षी फटका बसतो आहे.
महामार्गाच्या कामांची सद्यःस्थिती काय?
रायगड जिल्ह्यात नागोठणे, कोलाड, लोणेरे येथे पुलांची आणि सर्व्हिस रोडची कामे शिल्लक आहेत. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची कामे रखडली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर ते हातखंबादरम्यान महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या परिसरात महामार्गाची परिस्थिती सर्वाधिक दयनीय आहे. चिपळूण येथे उड्डाण पुलाचे काम रखडले आहे. ही कामे अजून वर्षभर तरी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
रेल्वे मार्गावर दरडी का कोसळतात?
कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याची प्रामुख्याने चार कारणे आहेत. हा प्रदेश पर्वतमय आहे. या परिसरात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. खडकांची रचना दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरते. आणि हा परिसर भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो, या चार कारणांमुळे दरडींचा धोका वाढतो. कोकणातील रस्ते आणि रेल्वे मार्ग हा घाट माथ्यावरून जातो. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गासाठी डोंगर पोखरले जातात. त्यामुळे कालांतराने डोंगर माथ्यावरील सैल होण्यास सुरवात होते. अतिवृष्टीने सैल झालेले हे दगड आणि डोंगर पावसाळ्यात कोसळण्यास सुरुवात होते. कमी वेळात जास्त पाऊस ज्यावेळी होतो त्यावेळी दरडी कोसळतात.
कोणत्या उपाययोजना गरजेच्या?
दरडींचा धोका कमी करण्यासाठी रेल्वे मार्गालगत गॅबियन वॉल्सची उभारणी करणे, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल यासाठी उपाययोजना करणे, पावसाळ्या पूर्वी सैल झालेले दगड डोंगर हटवणे, डोंगर माथ्यावर वृक्षस लागवड करणे, डोंगरांवरील वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी वणव्याना रोखणे आणि दरड संरक्षक जाळ्या बसवणे आवश्यक आहे. या उपाययोजनामुळे रेल्वे मार्गावरील दरडींचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाची उर्वरित कामे तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे. या शिवाय मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरू शकेल अशा रेवस-रेड्डी सागरी मार्गाचे कामही गेली चार दशके रखडले आहे. राज्य सरकारने या मार्गावरील सात पुलांच्या कामांना मंजुरी दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली नाही. याशिवाय राज्य सरकारने कोकणासाठी ग्रीन फील्ड एक्सप्रेस महामार्ग उभारण्याची घोषणा केली आहे. कोकणात जाण्यासाठी आगामी काळात तिसरा आणि वेगवान पर्यायी मार्ग असणार आहे. सध्या या महामार्गासाठी डीपीआर बनवण्याचे काम सुरू आहे, हे काम तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे.
Harshad.kashalkar@expressindia.com