राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने बोरिवली पडघा येथे चारशे पोलिसांची कुमक घेऊन नुकतेच छापे टाकले. साकिब नाचण आणि इतरांच्या घरांची झडती घेतली. या झडतीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधी विभागाने सशस्त्र कायद्याअंतर्गत दोन गुन्हे दाखल केले असले तरी दहशतवादी कारवायांचे ‘पडघा कनेक्शन’ हे तसे जुनेच आहे. मध्यंतरी राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही साकिब नाचण याला अटक केली होती. आता राज्याच्या एटीएसनेही नाचण याच्याकडेच रोख ठेवला आहे. असे का, याचाच हा आढावा…
दशहतवादविरोधी विभागाची कारवाई…
देशभरात दहशतवादी कारवाया घडविण्याचा कट रचला जात असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवादविरोधी विभागाच्या ठाणे पथकाने न्यायालयातून झडती वॉरंट मिळवून साकिब नाचण याच्या पडघा येथील घरी छापे टाकले. या छाप्याअंतर्गत पोलिसांना तलवार, चाकू तसेच दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणारी काही आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाली. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साकिब नाचण याचा मोठा मुलगा अकिफ याचीही चौकशी करण्यात आली. ठाणे ग्रामीण पोलीस दलातील सुमारे ४०० पोलिसांची कुमक या छाप्यासाठी सोबत घेण्यात आली होती. राज्यातील दहशतवादविरोधी विभागाच्या १८ पथकांनी एकाच वेळी या कारवाईत भाग घेतला सध्या बंदी असलेल्या ‘स्टुडन्टस इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’चा (सिमी) सदस्य असलेल्या फारुख मुल्ला याच्या घरावरही छापा टाकण्यात आला. पहलगाम येथे झालेला दहशवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई यामुळे दहशतवादी कारवाया घडविल्या जाण्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. साकिब नाचण आणि त्याचा मुलगा शमील यांच्या दहशतवादी कारवाया सुरू असून त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे पडघा येथील अनेक तरुण कार्यरत झाल्याची माहिती मिळाली होती. त्यावरूनच ही कारवाई करण्यात आली, असे दहशतवादविरोधी विभागाने स्पष्ट केले.
साकिब नाचण कोण?
२००२ ते २००३ या काळात घाटकोपर, मुलुंड, विलेपार्ले, मुंबई सेंट्रल येथे बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपावरून साकिब नाचण आणि इतर १५ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात साकिब नाचण याचा युक्तिवाद करण्यास वकिलांनी नकार दिल्याने नाचणने न्यायालयात स्वत: युक्तिवाद केला. त्याचा परिणाम म्हणजे घाटकोपर बॉम्बस्फोटाच्या आरोपातून त्याची मुक्तता झाली. मात्र त्याच्या घरात एके-४७ व एके-५६ रायफल सापडल्याच्या आरोपात त्याला शिक्षा झाली. याशिवाय देशविघातक कारवायांविरोधी कायद्यानुसारही त्याला आणखी दहा वर्षे शिक्षा झाली. अखेरीस २०१७ मध्ये या शिक्षा भोगून तो बाहेर आला. परंतु त्यानंतरही दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय राहिल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. साकिब नाचण याला पहिल्यांदा अटक झाली ती १९९२ मध्ये अहमदाबाद येथे. त्यावेळी खलिस्तानी दहशतवादी लाल सिंग याच्यासह त्याला दहशतवाद आणि देशविघातक कारवायांअंतर्गत (टाडा) जन्मठेपेची शिक्षा झाली. परंतु त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा दहा वर्षांपर्यंत कमी केली. मात्र तेव्हापासून तो दहशतवादी कारवायांसाठी गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर होता.
सिमीचा काय संबंध?
साकिब नाचण या वाणिज्य विभागातील पदवीधर असून त्याने १९८० च्या काळात ‘जमात ए इस्लामी’ या संघटनेच्या विद्यार्थी विभागाच्या ‘सिमी’ या बंदी असलेल्या संघटनेत सक्रिय काम केले. पुढे तो सिमीचा महाराष्ट्र अध्यक्ष बनला आणि त्यानंतर महासचिव. मुंबईत झालेल्या दहा हजार सिमी सदस्यांच्या मेळाव्यामुळे तो अधिक प्रकाशझोतात आला. सिमीचा राष्ट्रीय अध्यक्ष एम बशीर याच्या तो संपर्कात आला. त्यानंतरच तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाला, असा पोलिसांचा दावा आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन उपायुक्त प्रदीप सावंत यांच्या पथकाने पडघ्यात सिमी चालवित असलेले दहशवादी प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केले होते. साकिब दोन वेळा पाकिस्तानात आणि तेथून अफगाणिस्तानला गेला, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. मुस्लिम तरुणांना स्फोटकांचे तसेच गनिमी काव्याचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी त्याने प्रयत्न केल्याचाही या यंत्रणांचा दावा आहे. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटिलिजन्सच्या (आयएसआय) ऑपरेशन केटू अंतर्गत खलिस्तानी व मुस्लिम दहशतवाद्यांसाठी भारतात निर्माण करावयाच्या यंत्रणांसाठी गुजरात सीमेची जबाबदारी नाचणवर सोपविण्यात आली होती, असाही गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून का अटक?
इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून साकिब नाचणसह १५ जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने डिसेंबर २०२३ मध्ये अटक केली. त्याआधी ऑगस्ट २०२३ मध्येच साकिबचा मुलगा शमील यालाही अशाच पद्धतीच्या दहशतवादी कारवायांसाठी अटक करण्यात आली. हे दोघेही सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत आहेत. मात्र कोठडीत असूनही त्यांच्यापासून प्रेरित होऊन दहशतवादी कारवाया केल्या जाण्याची दाट शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतरच पडघा व बोरिवली येथे छापेसत्र टाकण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक सदानंद दाते हे राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांनाही या संपूर्ण घटनाक्रमाची चांगलीच कल्पना आहे. आयसिसच्या माध्यमातून महाराष्ट्रात दहशतवादी कारवाया सुरू असल्याबाबत त्यावेळीही कारवाई करण्यात आली होती. आताही विशिष्ट माहितीद्वारेच कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतही दहशतवादी कारवाया सुरू असल्याचा दाव्याला पुष्टी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पडघाच का?
२००२-२००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात पडघ्यातील पाच जणांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा भाग उजेडात आला. प्रामुख्याने मुस्लिम लोकवस्ती असलेल्या या परिसरात असलेल्या डोंगराळा भागाचा दहशवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी वापरला गेल्याचे उघड झाल्यानंतरच गुप्तचर यंत्रणांची पडघ्यावर नजर गेली ती कायमचीच. आताही दहशतवादविरोधी पथकाने कारवाई करण्याचे कारण तेच सांगितले जात आहे. सिमीच्या देशविघातक कारवायाही याच परिसरात पहिल्यांदा उघड झाल्या. साकिब आणि शमील नाचण तसेच त्यांच्या अन्य साथीदारांच्या कारवायांमुळे तपास यंत्रणांचे पहिल्यांदा लक्ष पडघ्याकडेच जाते, असे सूत्रांनी सांगितले. आयसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलनेही पडघा परिसरालाच महत्त्व दिले होते. आयसिसच्या कारवाया प्रामुख्याने पडघा व बोरिवली या परिसरातच सुरू असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीतही स्पष्ट झाले होते. बोरिवली व पडघा परिसरात आजही छुप्या दहशतवादी कारवाया सुरू असल्याची गुप्तचर यंत्रणांची खात्री आहे. त्यामुळेच छापेमारी करून या कारवाया खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
nishant.sarvankar@expressindia.com