भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत पहिली कसोटी इंग्लंडने तर दुसरी कसोटी भारताने जिंकली. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना उर्वरित दोन कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. या दोन कसोटींसाठी भारताच्या चमूची आज घोषणा करण्यात आली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. पण या दोघांना संघात न घेता उमेश यादवला चमूत समाविष्ट करण्यात आले. तसेच, पहिल्या दोन सामन्यांसाठी चमूत असणाऱ्या मराठमोळ्या शार्दुलला संघाबाहेर करण्यात आलं. BCCIने ट्विट करत ही माहिती दिली.

भारताचा चमू-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त होता. तो थेट अहमदाबादमध्ये संघात दाखल होणार आहे. त्याची दुखापकृत पूर्णपणे बरी झाली आहे की नाही याचा वैद्यकीय समितीकडून आढावा घेण्यात येईल. त्यानंतर त्याला संघात दाखल केलं जाईल. तो संघात आल्यानंतर ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलला चमूतून बाहेर सोडलं जाईल आणि तो विजय हजारे करंडक स्पर्धेत सहभागी होईल, अशी माहितीही देण्यात आली.

निवड समितीने पाच नेटमधील गोलंदाज आणि दोन राखीव खेळाडूदेखील घेतले आहेत. अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, कृष्णप्पा गौतम, सौरभ कुमार हे नेटमधील गोलंदाज आहेत तर केएस भरत आणि राहुल चहर हे राखीव खेळाडू असणार आहेत.