scorecardresearch

IND vs AUS: “अडीच दिवसात टेस्ट मॅच संपणे ही…” टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूने इंदोर कसोटीवर ओढले ताशेरे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरने खेळपट्टीवर टीका केली आहे.

IND vs AUS: It's a shame for India to end a Test match in two-and-a-half day’s comments Gautam Gambhir on Indore Test
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

कसोटी सामना अडीच दिवसांत संपणे हे कसोटी क्रिकेटसाठी चांगले संकेत नसल्याचे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिले तीन कसोटी सामने अवघ्या तीन दिवसांत संपले. पहिल्या तीन कसोटी सामन्यांतील खेळपट्ट्यांच्या स्वरूपाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, कसोटी सामना अडीच दिवसांत समाप्त होणे ही चांगली गोष्ट नसल्याचे गंभीरने म्हटले आहे.

गंभीरने स्पोर्ट्स टुडेशी बोलताना सांगितले की, “मला वाटते की टर्निंग ट्रॅकवर खेळणे ठीक आहे, पण अडीच दिवसात कसोटी सामना संपल्याबद्दल मी कधीही कौतुक करणार नाही. भारतीय क्रिकेटसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीदरम्यान पाहिल्यासारखे रोमांचक सामने पाहू इच्छितो. सामना चौथ्या किंवा पाचव्या दिवशी गेला तर चांगले आहे पण अडीच दिवस खूप कमी आहेत.” इंदोर कसोटीतील पराभवानंतर कसोटी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजीविरुद्ध खेळण्याच्या भारतीय फलंदाजांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गंभीरला मात्र असे वाटते की भारतीय फलंदाज फिरकी खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत आणि तसे नसते तर ते १०० कसोटी सामने खेळू शकले नसते.

हेही वाचा: IND vs AUS: “हा शुद्ध मूर्खपणा…”, रोहित शर्माने रवी शास्त्रींच्या ‘त्या’ विधानाला दिलं प्रत्युत्तर

तो म्हणाला, “मला नाही वाटत. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मासारखे लोक फिरकीचे वाईट खेळाडू आहेत. ते जर वाईट खेळाडू असते फिरकीचे तर १०० कसोटी सामने खेळलेच नसते. आपण खूप चांगले असणे आवश्यक आहे पण त्याच बरोबर परिस्थिती देखील तशी असणे गरजेचे आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी फिरकी आणि वेगवान गोलंदाजीचे चांगले खेळाडू आपल्याकडे आहेत पण पहिल्या दिवसापासून एवढी वळण घेणारी खेळपट्टी देणे हे एकप्रकारे फलंदाजांवर अन्याय केल्यासारखे आहे. कसोटीमध्ये एक गोष्ट बदलली आहे ती म्हणजे डीआरएसने मोठी भूमिका बजावली आहे.”

कसोटी क्रिकेटमध्ये डीआरएसच्या भूमिकेचे कौतुक होत नाही, असे सांगून गंभीर म्हणाला की, “कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी फलंदाजांना फलंदाजीतील तंत्र बदलावे लागते.” गंभीर पुढे म्हणाला, “जेव्हा समोरच्या पायावर डीआरएस आणि एलबीडब्ल्यू नव्हते, तेव्हा कधी-कधी तुम्हाला तुमचे तंत्रही बदलावे लागले. लोक याबद्दल फारसे बोलत नाहीत.”

हेही वाचा: Jasprit Bumrah: होळीच्या दिवशी टीम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी, जसप्रीत बुमराहवरील शस्त्रक्रिया यशस्वी

रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळाडूंनी खेळावे, असा सल्लाही गंभीरने पुढे बोलताना दिला. ”ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी अनेक भारतीय फलंदाजांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती, परंतु कोणीही त्यात खेळला नाही. प्रत्येक मोठ्या मालिकेपूर्वी रणजी ट्रॉफी खेळली पाहिजे,”असे गंभीर म्हणाला. तो म्हणाला, “रणजी ट्रॉफी खेळायला हवी होती. यापेक्षा उत्तम तयारी होऊ शकली नसती. १५-२० दिवस शिबिरे लावा जेष्ठ-कनिष्ठ सगळ्यांना खेळवा. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघर्ष करावा लागला कारण ते सराव सामने खेळले नाहीत. ही त्यांची नकारात्मक मानसिकता आहे. गोलंदाज विश्रांती घेऊ शकतात पण फलंदाजांनी रणजी ट्रॉफी खेळली पाहिजे. तिथे जा आणि शतक, द्विशतक धावा करा. जरी धावा झाल्या नाहीत तर तुम्ही लाल चेंडूने खेळण्यासाठी त्या माहोलमध्ये जाल. मोठ्या मालिकेपूर्वी लाल चेंडूने खेळण्याची संधी मिळेल तेव्हा खेळायला हवे.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 18:18 IST
ताज्या बातम्या