Sugar Detox Effects: गोड पदार्थ खाणं आवडत नाही असे लोक फार क्वचित सापडतील. अनेकांच्या दिवसाची सुरुवात गोड चहा, कॉफीने होते; तर दिवसभरातदेखील आपलं अनेकदा गोड पदार्थ खाणं सुरू असतं. त्यामुळे साखर हा आपल्या आहाराचा मुख्य भाग बनला आहे. पण, अनेक जण विविध कारणांसाठी अचानक साखर खाणं सोडण्याचा विचार करतात. पण खरंच, अशाचप्रकारे ३० किंवा ६० दिवसांसाठीच नव्हे तर ९० दिवसांसाठी साखर खाणं सोडल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, याचा कधी विचार केला आहे का? नसेल तर करा आणि त्याचे फायदेही जाणून घ्या.

साखर सोडण्याचा अर्थ काय?

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन डायरेक्टर डॉ. मनीषा अरोरा म्हणाल्या की, साखरेचे सेवन करणे सोडणे म्हणजे सर्व कार्बोहायड्रेट्सचे सेवन करणे सोडून देणे असे नाही; तर टेबल शुगर, हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि अगदी मध यांसारख्या नैसर्गिक गोड पदार्थांचे सेवन करणं टाळणं असा आहे. कार्बोहायड्रेट्स हा शरीरास आवश्यक पोषक घटक आहे, परंतु साध्या साखरेचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

साखरेचे सेवन करणे सोडल्यास दिसतील ‘ही’ लक्षणं

साखरेचे सेवन करणं बंद केल्यास सुरुवातीला डोकेदुखी, चिडचिड, थकवा आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा होणं यांसारखी लक्षणं दिसू शकतात. कारण मेंदू साखरेचा वापर जलद ऊर्जेचा स्रोत म्हणून करत असतो. पण, कोणतीही नवीन सवय लागण्यासाठी साधारणपणे २१ दिवस लागतात आणि ती सवय पूर्णवेळ टिकून राहण्यासाठी सुमारे ६६ दिवस लागतात,” असे डॉ. अरोरा म्हणाल्या.

९० दिवस साखरेचे सेवन करणं टाळल्यास शरीरात काय परिणाम दिसतील?

९० दिवस साखरेचे सेवन टाळण्याचे अनेक फायदे आहेत जे लक्षात घेण्यासारखे आहेत. डॉ. अरोरा म्हणाल्या की, वजन कमी होते, इन्सुलिन सेंसिटिव्हीटी सुधारते, ऊर्जा पातळी स्थिर होते, त्वचेचे आरोग्य सुधारते, मूड स्विंग कमी होतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. दात किडण्याचा धोका कमी झाल्यामुळे तोंडाच्या आरोग्यासाठीदेखील हे फायदेशीर ठरते, असेही डॉ. अरोरा म्हणाल्या.

मुंबईच्या परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन सिनिअर कन्सल्टंट डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी या विषयी अधिक माहिती दिली.

डॉ. मंजुषा म्हणाल्या की, पहिल्या काही दिवसांत तुमचे शरीर या सवयीशी जुळवून घेत असताना तुम्हाला साखर खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. मूड स्विंग किंवा थकवा जाणवू शकतो. पण, सवय झाल्यानंतर शरीराची ऊर्जा पातळी स्थिर होते, मूड अधिक चांगला होतो, तुम्हाला बरे वाटते. यादरम्यान दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात पचनक्रिया, त्वचेचे आरोग्य सुधारते आणि झोपेसंबंधित तक्रार दूर होतात. यादरम्यान वजन नैसर्गिकरित्या कमी होऊ शकते, विशेषतः पोटाच्या आसपास चरबी कमी होते. शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते, असे डॉ. अग्रवाल म्हणाल्या.

कालांतराने तुमच्या तोंडाची चव रिसेट होत जाते, ज्यामुळे फळांसारख्या नैसर्गिक पदार्थांची अधिक गोड चव समाधानकारक वाटू लागते. मग, जसजसा वेळ जातो तसतसे परिणाम दिसू लागतात, यानंतर तुम्ही स्वतः साखर खाणं टाळण्यास सुरुवात कराल. ९० दिवसांच्या अखेरीस टाइप २ मधुमेह, हृदयरोग आणि फॅटी लिव्हरसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. तुमची खाण्याची लालसा कमी होते, कामावर चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रित करू शकता; तसेच यामुळे अधिक आरामदायी वाटते, असेही डॉ. अग्रवाल म्हणाल्या.

काय लक्षात घ्यावे?

डॉ. अरोरा पुढे सांगतात की, योग्य नियोजन न करता अचानक साखरेचे सेवन बंद केल्यास शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते, त्यामुळे साखरेच्या जागी संतुलित, पोषक तत्वांनी समृद्ध अशा पदार्थांचे सेवन करणे आणि गरज पडल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९० दिवस साखरेचे सेवन करणं बंद केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा जाणवू शकतात, ज्यामुळे निरोगी सवयी लागतात. साखरेचे सेवन पूर्णपणे बंद करणे सोपे नसले तरी ते तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मात्र खूप फायदेशीर आहे. म्हणून निरोगी आरोग्यासाठी साखरेचे सेवन पूर्णपणे बंद करणं चांगली कल्पना आहे,” असे डॉ. अग्रवाल म्हणाल्या.