सारिका चाटुफळे-कुलकर्णी

देव आनंद आज असता तर शतकपूर्ती करून उलट गणतीने पुन्हा चिरतरुण बनण्यासाठी सज्ज झाला असता. हिंदी सिनेमा ईस्टमन कलर होण्यापूर्वीपासून त्याची डिजिटल युगाकडे वाटचाल होत असतानापर्यंतचा सारा काळ पडद्यावर आत्मप्रेमाची कौतुके घेऊन देव आनंद सादर झाला. तरीही निरागस आणि तितकाच हौशी अभिनेता आनंदाचा वटवृक्ष म्हणून दोनाहून अधिक दर्शकांच्या पिढीने पसंत केला. त्याच्या लक्षवेधी लकबी आणि कलावंती बाण्याला आजच्या काळाशी पडताळून पाहण्याचा प्रयत्न.. 

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
idli or dosa batter is never over-fermented
World Idli Day : इडली स्वादिष्ट व्हावी म्हणून पीठ जास्त दिवस आंबवता का? ही सवय आताच थांबवा….

हर्षद मेहतावरील वेब सीरिज सुरू आहे. मोठय़ा महत्त्वाकांक्षेने हर्षद मेहता पैसे कमावतो आहे. घरचे सगळे जण त्याला जरा सांभाळून धंदा करण्याचा सल्ला देत आहेत, त्याची बायको काळजीत पडलेली आहे. तितक्यात तो म्हणतो, ‘‘रिस्क है तो इस्क है.’’ अजून एका दृश्यात तो म्हणतो, ‘‘मेरा इंटरव्ह्यू लेनेसे पेहले मेरे बारे में जान लेना, क्या है की मुझे जान जाओगे तो मान जाओगे.’’ इतका वेळ केवळ कानावर पडणारे संवाद बघण्यासाठी म्हणून मी टीव्हीकडे चेहरा करते आणि डोळे फाडून बघू लागते- केवढं आश्चर्य! हर्षद मेहताच्या भूमिकेत मला देव आनंद दिसू लागतो. चिकना चोपडा देव आनंद. हर्षद मेहताचे संवाद त्याच्या स्वत:च्या मुंडी-हलवत्या लकबीनं म्हणताना कसा वाटेल याची फक्त कल्पनाच करावी आणि निखळ मनोरंजनाचा आनंद घ्यावा.

नंतर हाच देव आनंद मला मिर्झापूरमधील अखंडानंद त्रिपाठीच्या भूमिकेत दिसला. माफिया- डॉनच्या धीर-गंभीर रूपात देव आनंद दिसला तर कसं वाटेल? म्हणजे तिरक्या तिरक्या चालीनं येऊन ढिल्या हातात चाकू पकडून देव आनंदनं खून कसे पाडले असते? किंवा एक डॉन म्हणून आपल्या चेल्यांना राडा करण्याच्या आज्ञा त्यानं दिशादर्शक बोटांनी कशा दिल्या असत्या?

हेही वाचा >>> दुष्काळाआधीची चिंता..

आज देव आनंद असता तर तो १०० वर्षांचा झाला असता. तसा तो वय विचारात घेणारा कधीच नव्हता. मला तर वाटतं, जर देव आनंद आज असता तर त्यानं एफ. स्कॉट फित्झगेराल्डच्या जगप्रिय कथेमधील ‘बेंजामिन बटन’सारखं वयाचं उलटं गणित सुरू केलं असतं.  म्हणजे पुढच्या वर्षी त्यानं नव्याण्णववा वाढदिवस साजरा केला असता. २००७ साली त्याच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी वय विचारल्यावर त्यानं अनेक वेगवेगळी उत्तरं दिली होती. कोणाला अठरा, कोणाला शंभर, तर कोणाला त्यानं सांगितलं होतं की, तो एजलेस आहे. चॉकलेट हिरो म्हणून प्रतिमा असणाऱ्या या नायकाला कधीच कळलं नसेल का, की कोणीही ‘एजलेस’ असू शकत नाही; पण तरीही तो वय नाकारत राहिला. कारण त्याचा मनाच्या तारुण्यावर विश्वास होता. मन तरुण असेल तर शरीर आपोआप तरुण राहतं, असं तो म्हणत असे.

म्हणूनच वयातीत असलेला देव आनंद आजकालच्या सुप्रसिद्ध वेब सीरिज किंवा चित्रपटात दिसला असता, तर त्यानं कसा अभिनय केला असता याची कल्पना करताना अतोनात मनोरंजन होतं. तो जर बाहुबली झाला असता तर भव्यदिव्य असं शिविलग उचलताना मफलर घातलेला देव आनंद डोळय़ांसमोर आणताना वीरपणाची अतिशयोक्त अवस्था मिळाली असती. किंवा ‘नाटु नाटु’ म्हणत आपले हात ढिले करत पळताना पायासह मानेच्या व्यायामाचीही अजब कसरत जगाला चकित करून गेली असती. ‘‘मै पैसा कमाना नही, बनाना चाहता हू डार्लिग’’ असं म्हणणारा अब्दुल करीम तेलगी जर देव आनंदनं आपली खास टोपी घालून किंवा हातात काठी घेऊन केला असता तर? ‘‘झुकेगा नही साला’’ असं म्हणायला तो ‘पुष्पा’ सिनेमात असता तर? त्याचा चप्पलसोडी डान्स आणि वाकडा बाणा आणखी लोकप्रिय झाला असता?

‘चित्रपट माझा असेल तर सब कुछ मै’ या तत्त्वावर काम करणाऱ्या देव आनंदनं कदाचित ‘डर्टी’ पिक्चर केला असता तर ‘ फिल्मे सिर्फ तीन चिझो से चलती है, एन्टरटेन्मेन्ट, एन्टरटेन्मेन्ट, एन्टरटेन्मेन्ट’ हा डायलॉगसुद्धा त्यानं चुंबकीय शक्तीनं स्वत:कडे राखला असता.

‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’ असे म्हणणारा बाप तो कधीही झाला नसता, कारण त्यासाठी त्याला म्हातारं दिसावं लागलं असतं. उतारवय, म्हातारपण ही विशेषणं त्याच्यासाठी कधीच नव्हती. त्याऐवजी मेंडोलिन बडविण्याच्या अंगुलीकसरतीची मानमोडी कला त्यानं प्रसिद्ध केली असती आणि धावत्या ट्रेनमध्ये आपल्या वजनाच्या सव्वापट नायिकेला अलगद उचलण्याचा टाळीफेक प्रसंगही गाजवला असता.

हेही वाचा >>> उद्योग यशोगाथेचे अल्पसंख्य लाभार्थी..

या सगळय़ा चित्रपटांत देव आनंदची कल्पना करताना तो जास्त मनोरंजक वाटला असता की, तो त्याच्या मूळ चित्रपटात अधिक हास्यास्पद आहे कुणास ठाऊक? पण जो काही होता तो देव आनंद मात्र तीन पिढय़ांच्या स्त्रियांच्या मनात आदर्श नायक होता, हे मात्र निर्विवाद सत्य. आजी, आई आणि मुलगी अशा तीनही पिढय़ा त्याच्या प्रेमात पडल्या होत्या. खरं तर त्याच्या दिसण्याच्या प्रेमात होत्या. लोकांच्या मनात असलेलं आपलं चॉकलेट हिरोचं स्थान त्याला जपायचं होतं. आणि म्हणूनच ऐंशी वर्षांचा होता तेव्हाही कधीही साध्या वेशात, गबाळा, चप्पल घातलेला देव आनंद कोणाला दिसूच शकला नाही. चट्टय़ापट्टय़ाचा पायजमा, बनियन यामध्ये म्हणे देव आनंदला बघण्याची कित्येक तरुणींची आस होती; पण  तो त्यांच्या दूधवाल्यालाही कधी त्या वेशात दिसला नाही. तो कायम स्कार्फ, पॉलिश केलेले चकचकीत बूट, टोपी, ओव्हरसाइझ कॉलर असाच टुकटुकीत दिसत राहिला. स्वप्रतिमेच्या प्रेमात पडण्याची आपल्या नेत्यांची परंपरा तशी बरीच जुनी आहे, असं देव आनंदकडे बघितल्यावर लक्षात येतं.

हेही वाचा >>> आयात-निर्भर आपण..

आताच्या नायकाप्रमाणं देव आनंदला मारामारी करावी लागली असती तर ती त्यानं कशी केली असती? छातीच्या फासळय़ा दाखवत की ‘आ बिशुम.. आ बिशुम..’ यांसह चालणाऱ्या ताणवर्धित पार्श्वसंगीताच्या नादावर? एकंदरच देव आनंदच्या सिनेमातील हाणामारी हा एक विचित्र प्रकार होता. त्यात देव आनंदसारख्या गोऱ्यागोमटय़ा लुक्कड-लप्पूनं नायिकेसमोर पीळदार राक्षसी शरीरांच्या खलसमूहाला नमवणं म्हणजे तर अद्भुत प्रकार. देव आनंदनं वाईट भूमिका केल्याच नाहीत असं नव्हे. उलटपक्षी देव आनंदच्या आधीचा नायक म्हणजे अशोक कुमार. पडद्यावरती अशोक कुमार म्हणजे निव्र्यसनी, सभ्य, बिचारा, सरळमार्गी वगैरे वगैरे; पण देव आनंद आला ओठांत सिगारेट घेऊन, पाकीट मारत, संस्कार आणि संस्कृतीला धक्का देत. ‘बाजी’, ‘काला बाजार’, ‘हाऊस नंबर ४४’, ‘टॅक्सी ड्राइव्हर’, ‘जाल’ यातील देव आनंद आठवून बघा. सगळे अवगुण अंगी असणारा नायक त्यानं साकारला होता; पण तरीही देव आनंद ही व्यक्ती किंवा त्यानं साकारलेला नायक हे दोन्ही प्रेक्षकांना कधीही दुष्ट वाटले नाहीत. त्याचा अभिनयच असा होता की तो दुष्ट वाटणं शक्यच नव्हतं. अभिनय फारसा जमत नसतानाही चेहऱ्याच्या आणि लकबीच्या जोरावर सुपरस्टार पदावर विराजमान झालेला केवळ देव आनंदच.

हेही वाचा >>> आदर्श व्यक्ती, बुलंद गायिका

आपल्याला काळा कोट घालणारे वकील तेवढे माहिती आहेत. त्यांच्यावर फिदा होण्याचा प्रश्नच येत नाही; पण काळा कोट घातलेल्या देव आनंदच्या तरुणी एवढय़ा प्रेमात होत्या म्हणे. त्याचं ते रूप बघायला रस्त्यावर प्रचंड गर्दी होत असे. त्यामुळे त्याला रस्ता बदलून  जावं लागत असं. मग कंटाळून त्यानं शेवटी काळा कोट घालणं सोडून दिलं. आपल्या प्रियकरात आणि नवऱ्यात देव आनंद बघणाऱ्या किती तरी तरुणींच्या सुरस कहाण्या मी ऐकलेल्या आहेत. जसं की, कित्येक तरुणींनी म्हणे वकील मुलांशी लग्न केलं, त्यानिमित्तानं रोज त्यांना काळा कोट बघायला मिळेल. तरुणांनीसुद्धा आपल्या प्रेयसीला, पत्नीला देव आनंद आवडतो म्हणून केसाचा कोंबडा ठेवला होता. देव आनंदच्या दातात फट होती. हसताना ती दिसत असे. त्यावरदेखील कित्येक तरुणी फिदा होत्या. आमच्या ओळखीच्या एका काकूंनी म्हणे लग्नाआधी नवऱ्याला अट घातली होती की दातात फट असेल तरच लग्न करेन. शेवटी काकूंशी लग्न करण्यासाठी काकांनी एक दात पाडून घेतला होता. दाताची फट तशीच राहिली; पण पुढे जाऊन काकांच्या डोक्यावरील कोंबडा जाऊन केस होत्याचे नव्हते झाले तेव्हा काकूंनी काय केलं असेल?

दिलीप कुमार, अशोक कुमार, राज कपूर असे अभिनेते एकाच वेळी चित्रसृष्टी गाजवत असणाऱ्या त्या काळात देव आनंद आला. त्याच्याकडे दिलीप कुमारसारखा अभिनय नव्हता की राज कपूरसारखा ‘चॅप्लिनी’ भाबडेपणा चेहऱ्यावर मिरवण्याची हातोटी; पण त्याच्याकडे काय आहे याची त्याला पूर्णपणे जाण होती. त्याच्याकडे चेहरा होता. शाळेत असतानाही मुली त्याच्या मागे असायच्या, हे त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. या चेहऱ्याचा, त्यावरील निरागसपणाचा त्यानं वापर केला. त्याची हातवारे करण्याची, खांदे पाडून चालण्याची, हात ढिले सोडण्याची, मान फिरवण्याची लकब हीच त्यानं अभिनय म्हणून चालवली. इतकी की, लोक त्याची नक्कल करू लागले. त्यानं सैनिकाची भूमिका केली, त्यानं गुंडाचीही भूमिका केली; पण तो कधी बहादूर वाटलाच नाही. उलट विनोदीच वाटला. कानात पुटपुटत असल्यासारख्या बोलण्याचा त्याचा अभिनय म्हणजे कित्येकांना उत्तम संवादफेक वाटे. या पद्धतीनं आजकालच्या वेब सीरिजमध्ये तो एकदम फिट बसला असता, कारण हल्ली सबटायटल बघितल्याशिवाय संवाद कळतात कुठे?  एखाद्या पौराणिक चित्रपटात तो राम किंवा विष्णू म्हणून कधीही शोभला नसता; पण त्याच्या गोड चेहऱ्यामुळे कदाचित इंद्र अथवा श्रीकृष्ण मात्र लोकांना बघायला आवडला असता.

हेही वाचा >>> अवघड काळावरचे सिनेमे नंतरच येतात..

एकसे एक उत्तम गाणी देव आनंदला मिळाली. पार्श्वगायक म्हणून रफी असो, किशोर असो, मन्ना डे असो किंवा अगदी तलत वा हेमंत कुमार असो, चेहऱ्यावर सारखाच भाव. काही प्रेमगीतं तर अगदी भक्तिगीतं वाटावीत असे भाव चेहऱ्यावर आहेत; पण देव आनंदला संगीत कळत होतं. गाणं चालू असताना देव आनंदच्या ओठाच्या हालचालीवरून ते लक्षात येतं. कित्येक अप्रतिम संगीत असलेले चित्रपट देव आनंदनं केले. सिगारेट ओढणारे त्याचे चित्रपटातील धुंद रूप बघितलं की त्या काळी म्हणे तरुणी आपल्या प्रियकराला सिगारेट ओढायचा हट्ट करीत असत. पुरुषही सुंदर असतात हे देव आनंदकडे बघितल्यावर लोकांना कळू लागलं. त्याचा प्रणय हा हळुवार होता, तो खटय़ाळ वाटत असे. पिंगा घालत, आपले आर्जव करत, धसमुसळा न होता प्रेम करणारा देव आनंद स्त्रियांना फार आवडला होता, कारण एकदा बस सुटली की तिच्या मागे कोण धावेल या विचाराने एकदा लग्न झालं की बायकोकडे कोण लक्ष देईल, अशी नवऱ्याची जमात असते. मग अशा वेळी ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘शोखियों मी घोला जाये’, ‘फुलों के रंग से’, ‘पल भर के लिये’ अशी गाणी म्हणणारा देव आनंद आपल्या स्वप्नातील राजा न वाटला तर नवलच. भले तो गाण्याच्या वेळी नायिकेकडे बघतही नसेल. बहुतेक गाण्यांमध्ये तो बहुतेक वेळा नायिकेला विसरून गेलेला आहे. हे ‘सोलो’ गाणे असल्यासारखाच त्याचा गानाभिनय झालेला आहे; पण तरीही रॅपिड फायर राऊंडमध्ये धावल्यासारखी त्याची धावण्याची पद्धत आणि दातांची फट दाखवत हसणं बायकांना आवडलं होतं. त्याच्यासारख्या स्वेटरची डिझाइन्स बायका नवऱ्यासाठी बनवत असत. ही डिझाइन्स लक्षात राहावीत म्हणून कित्येक वेळा सिनेमा बघत असत. त्याच्यासारखे स्कार्फ प्रियकराला भेट देत असत. देव आनंदचे चित्रपट बघणं म्हणजे प्रेक्षकांसाठी मोरपीस फिरवल्याचा आनंद होता. देव आनंदवर चित्रित झालेली कित्येक गाणी आपल्या प्रियकरानं कधी तरी गावीत अशी स्वप्नं त्या काळी तरुणींनी नक्कीच बघितलेली असणार.

हेही वाचा >>> बांगलादेश आणि स्थलांतर : नव्या उत्तरांचा शोध..

आजच्या काळातही त्यानं अशाच स्वप्निल भूमिका केल्या असत्या की नवाजुद्दीन सिद्दीकी किंवा के के मेननसारख्या शिवीबळ असलेल्या भूमिका वठवल्या असत्या, हा खरे तर प्रश्नच आहे. त्या केल्या असत्या तर कशा, हा त्याहून मोठा प्रश्न आहे. ‘देखने मे भोला है’ गाण्यात तो जसा चालला आहे, तसा तो आजकालच्या कुठल्या गाण्यात चालला असता तर ‘वेगळा’ शिक्काही त्याच्यावर लागला असता; पण एवढं सगळं असूनही त्यापलीकडे देव आनंद राहिलाच असता- त्याच्या विजिगीषु वृत्तीमुळे. आपल्याला काय जमतं हे कळणं महत्त्वाचं, तसं काय जमत नाही हेदेखील महत्त्वाचंच. ते देव आनंदला कळलं होतं का? म्हणूनच फारसा ग्राम्य भूमिका किंवा पौराणिक भूमिकेच्या तो नादी लागला नसेल का? आपल्या खिशातील दोन रुपयांचं नाणं हरवलं, कामवाली बाई काम सोडून गेली, बायको भांडली, भारतीय संघ बांगलादेशबरोबरची मॅच हरला, कॉल सेंटरचे नको तेवढे फोन येऊन गेले, भाजीबरोबर मोफत कोथिंबीर मिळालीच नाही.. अशा कुठल्याही कारणानं आपण चिडतो, भांडतो, देवाकडे तक्रार करतो; पण देव आनंद मात्र नावाप्रमाणे आनंदी राहिला. कित्येक चित्रपट पडले, पण तो पडला नाही. तो पुन:पुन्हा उठला. चित्रपटातून कमावलेला पैसा चित्रपटातच टाकत राहिला. आपलं सौंदर्य जिवापाड जपत राहिला, स्वत:वर प्रेम करत राहिला.

‘गाईड’मध्ये त्यानंच म्हटलंय, ‘न सुख है, ना दुख है, न दिन है, ना दुनिया, न इन्सान, न भगवान, सिर्फ मैं हू, मैं हू, मैं हू.’

म्हणूनच आज त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या शंभराव्या वाढदिवशी तो आपल्यातच आहे.

sarika@exponentialearning.in