रुग्णांचा नवा उच्चांक; २४ तासांत ५३७ बाधित

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत पालघर तालुक्याने २४ तासांत रुग्णवाढीचा नवा उच्चांक गाठला असून पालघरमध्ये तब्बल ५३७ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यच्या ग्रामीण भागात आढळलेल्या ८७० नवीन रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. पालघर तालुका हा सध्या जिल्ह्यतील ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. परिस्थिती पाहता जिल्ह्यतील संक्रमण रोखण्यासाठी पालघर तालुका व जिल्हा प्रशासन अपयशी ठरले असल्याचे म्हटले जात आहे. एप्रिल महिन्यात पालघर तालुक्यात तब्बल ४५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत पालघर तालुक्यातील ५३७ रुग्णांसह डहाणू तालुक्यात १२२, वाडा ९८ तर जव्हार तालुक्यात ६९ रुग्णवाढ झाली आहे. यापूर्वी २४ एप्रिल रोजी पालघर तालुक्यात ५२३ रुग्णवाढ, २७ एप्रिल रोजी ४२३ तर १६ एप्रिल रोजी ४०६ रुग्णवाढ नोंदवण्यात आली होती. ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ४६४ वर पोहोचली आहे.

पालघर तालुक्यात झालेल्या रुग्णवाढीत पालघर नगर परिषद क्षेत्रात १२३, बोईसर ७६, सरावली २५, बेटेगाव, पाम व खैरेपाडा प्रत्येकी १०, दांडीपाडा- काटकरपाडा नऊ, पास्थळ ३१, माहिमा ४३, मनोरमध्ये ११ रुग्णवाढ झाल्याचे दिसून आले आहे.पालघर तालुक्यात व नगर परिषदेच्या अंतर्गत होणारी रुग्णवाढ रोखण्यास प्रशासन अपयशी ठरले असून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लावलेल्या र्निबधांचे पालन होत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

ग्रामीण जिल्ह्यात ६८२२ उपचाराधीन रुग्ण असून त्यापैकी ३५७० रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. तर डहाणू तालुक्यात ९३३, जव्हार तालुक्यात ९४२ उपचाराधीन रुग्ण असून इतर तालुक्यांमधील  रुग्णांची संख्या दोनशे ते तीनशेच्या जवळपास आहे. त्यापैकी चार हजार ९९ रुग्ण गृहविलगीकरणात असून १३६८ रुग्ण जिल्ह्यबाहेर उपचार घेत आहेत.

पोलिसांकडून कारवाई

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध पालघर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. ५ ते २४ एप्रिलदरम्यान आदेशाचे अनुषंगाने २०८ गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यामध्ये १३ हॉटेल- रिसॉर्ट, ९१ दुकाने, आठ हळदी व लग्न समारंभांचा समावेश आहे. मुखपट्टी परिधान न करणाऱ्या २०७१ नागरिकांविरुद्ध कारवाई करून नऊ लाख ५९ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.  इतर जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी २३ एप्रिलपासून २७ एप्रिलपर्यंत १११३ ई-पासकरिता अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४८३ ई-पास अर्जाना परवानगी देण्यात आली आहे. १६ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे  देण्यात आली.