शेतीपंपास दिवसा १० तास वीज द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी करत असलेल्या आंदोलनाकडे महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत पालकमंत्री सतेज पाटील यांना हातकंणगले येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानी रविवारी काळे झेंडे दाखवित निदर्शन केली.
कोल्हापूर महावितरणच्या कार्यालयावर विजेच्या विविध या मागणीसाठी शेट्टी २२ फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन करीत आहेत. जिल्ह्यात धरणे आंदोलनाबरोबर, चक्का जाम, सरकारी कार्यालयात साप सोडणे यासारखे आंदोलन होत आहे. तर आज कोल्हापूरचे पालकमंत्री पाटील यांना काळे झेंडे दाखवित गाड्यांचा ताफा अडविला. पाटील तोंडावर गोड बोलत जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून शासन स्तरावर कोणताच प्रयत्न केला नसल्याने जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे,धनाजी पाटील, संपत पवार ,सुरेश शिर्के आदी संतप्त कार्यकर्त्यांनी करत त्यांना काळे झेंडे दाखविले.
उर्जा मंत्र्यांना बैठकीचे पत्र
दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी आणि कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १० तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या बेमुदत आंदोलनावर चर्चा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सबंधित सचिव व अधिकारी आणि माजी खासदार राजू शेट्टी व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक तत्काळ आयोजित करावी, अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे आज पत्राद्वारे केली आहे.