Marathi News Highlights , 26 June 2025: गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. यामध्ये शक्तीपीठ महामार्गासह महाराष्ट्रातील शाळांमध्ये केंद्र सरकारचे त्रिभाषा सूत्र राबविण्यावरून राज्य सरकारवर आता सर्वच क्षेत्रांतून टीका होऊ लागली आहे.
याचबरोबर, भाजपाचे आमदार बबनराव लोणिकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे लोणिकर यांच्यासह सरकारवरही टीका होत आहे.
दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अदाणी समूहावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व योजना अदाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत. त्यामुळे यांना हाकलून देणे हे आमचे ड्रीम प्रोजेक्ट आहे.”
दुसरीकडे, गेल्या महिन्याभरापासून राज्यातील विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून, राज्यात सर्वत्र पावसाचा जोर अद्याप कायम आहे.
या विविध घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Maharashtra Latest News Highlights : महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स
नवीन शैक्षणिक वर्षात दप्तराच्या ओझ्यांचा वाद प्रारंभ
बारामतीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे खासदार सुनेत्रा पवार यांनी केले स्वागत
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीत पोहोचताच राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत केले. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील उंडवडी येथील मुक्कामा आटोपून आज बारामती शहरात दाखल झाला. बारामती शहराच्या वेशीवर राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पालखीचे स्वागत केले.
गुहागर मधील ३५ लाखाच्या विकास कामाला स्थगिती ; माजी आमदार डॉ. विनय नातू भडकले
‘चुकलो नसलो तरी माफी मागतो’, आमदार लोणीकरांनी मागितली शेतकऱ्यांची माफी
भाजपाचे जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल सोशल मीडियावरून टिका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल चुकीचे बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो, अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागीतली आहे. मी शेतकऱ्यांविरोधात मरेपर्यंत बोलणार नाही. मी शेतकऱ्यांमुळेच आहे. राजकीय नेत्यांकडून पैसे घेऊन सोशल मीडियावर मला ट्रोल करणाऱ्या टोळक्या विरोधात मी बोललो असल्याचे लोणीकर यांनी म्हटले आहे.
“आमच्या महिलांना भाजपाच्या गुंडांपासून सुरक्षित ठेवा”, काँग्रेसचे थेट कसबा गणपतीला निवेदन
भाजपाचा पदाधिकारी प्रमोद कोंढरे याने महिला पोलिसाचा विनयभंग केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. कोंढरेवर अजूनही कडक कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत, आज पुण्यामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या समोर आज काँग्रेसने गणपतीला निवेदन ठेवले, त्याचबरोबर प्रमोद कोंढरेचा फोटो कात्रीने कापला. लवकरात लवकर प्रमोद कोंडरेवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महिनाभरात करंजवण पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, मनमाडकरांची पाण्याची भ्रांत मिटणार
जळगावात इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे अर्थसहाय्य रखडले… लाभार्थी सहा महिन्यांपासून वंचित
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्दायवर ही भेट झाली. दरम्यान ही भेट झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आपण सरकारची भूमिका फेटाळली असल्याचे म्हटले आहे. भुसे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. गिरगाव ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढला जाणार आहे.
भाजपाचे परतूरचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या एका वक्तव्यावर राज्यभरातून टीका होऊ लागली आहे. मतदारसंघातील एका गावात केलेल्या भाषणात लोणीकरांनी त्यांच्या टीकाकारांवर हल्लाबोल केला. “तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला आहेत त्या आम्हीच दिल्या आहेत”, असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं होतं. यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक विरोधी पक्षांनी लोणीकरांवर टीका करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
“ते आतातरी महाराष्ट्राच्या…”, राहुल गांधींच्या विधानसभा निवडणुकीबाबतच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप करत आहेत की, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये गैरप्रकार झाले आहेत. दरम्यान, काल न्यायालयाने विधानसभा निवडणुकीवरील आक्षेप फेटाळून लावले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जर राहुल गांधी यांना देशाच्या लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असेल तर ते आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर बोलणार नाहीत."
जळगावात १५ ऑगस्टपासून ई-बससेवेची शक्यता धूसर… आगार, चार्जिंग स्थानकांचे काम संथपणे
"तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही", भाजपा आमदार लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य
Marathi News Live Updates : "बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा...", संजय राऊत यांचे भास्कर जाधवांना आवाहन; म्हणाले, "उद्धव ठाकरेंना..."
शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून पक्षाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अनेकांना स्थान मिळालं नाही. सुनील राऊत यांनाही स्थान मिळालं नाही. त्यांचा हक्क होता. म्हणून आम्ही रडत बसलो का? सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं. पण सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही. यासंदर्भात त्यांनी येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा स्वतः येऊन बोललं पाहिजे."
खामगावात स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसचा झेंडा फडकेल; माजी आमदार राहुल बोंद्रे
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आता नव्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेवर पक्ष चालतो आहे. नेते येतात आणि जातात मात्र जनता नेहमी आमच्या सोबत असते. काँग्रेस हा एक ऐतिहासिक पक्ष आहे. यामध्ये काँग्रेस प्रेमी आपला पक्षाचा झेंडा घेऊन सोबत काम करतात. काँग्रेसची विचारधारा घेऊन जाण्यासाठी खामगाव मतदारसंघात एक जागा पाहिजे त्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पुन्हा नव्याने ही जुनी काँग्रेस मोठ्या उत्साहात गरुड झेप घेईल. तसेच प्रत्येक गावात व येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकेल. असा विश्वास काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे.
सामाजिक न्याय दिनानिमित्त नांदेड शहरात काढण्यात आली समता दिंडी
राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सकाळी ८ वा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिनानिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या समता दिंडीमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांनी भर पावसात उस्फुर्त सहभाग नोंदवला.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात केले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी पाडूरंग बोरगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन व समता दिंडी ला हिरवा झेंडा दाखवत सुरवात करण्यात आली या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा होता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप झाला.
"विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध करून द्या", काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
गेल्या काही दिवसांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यांवरून निवडणूक आयोगावर सातत्याने आरोप करत आहेत. त्यांच्या या आरोपांना निवडणूक आयोगाने प्रत्युत्तरही दिले आहे. आता काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून, २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
पत्रात म्हटले आहे की, "आम्ही तुम्हाला विनंती करतो की, या पत्राच्या तारखेपासून एका आठवड्याच्या आत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या मतदान दिवसाचे मशीन-रिडेबल डिजिटल प्रत आणि व्हिडिओ फुटेज आम्हाला उपलब्ध करून द्यावेत. यानंतर काँग्रेस पक्ष बैठकीत विश्लेषणात्मक निष्कर्ष तुमच्यासमोर सादर करेल."
<strong>महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स. (फोटो सौजन्य पीटीआय)</strong>