Maharashtra Assembly Monsoon Session Highlights: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आल्यानंतर सरकारने हा निर्णय स्थगित केला आहे. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ५ जुलै रोजी विजय मेळावा साजरा करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन नेते एकत्र येत आहेत. दरम्यान हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधाक यांच्यात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने शेतकऱ्यांचा अवमान केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ताधाऱ्यांचे बाप असले तरी शेतकऱ्यांचे नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करीत विरोधकांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज रोखले. यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर एक दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, याचा निषेध म्हणून विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विधिमंडळ अधिवेशनचा आज तिसरा दिवस असून विधिमंडळात घडणार्‍या प्रत्येक घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवरही आपलं लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

16:56 (IST) 2 Jul 2025

थरारक! साठ वर्षांच्या वृद्धाची बिबट्यासोबत झुंज, बिबट्या मानगुटीवर बसताच…

वाघ किंवा बिबट पाहिल्यावर भल्या भल्यांची बोबडी वळते. मात्र भंडाऱ्याच्या भास्कर शिंदे या ढाण्या वाघाने बिबट्याला पळवून लावले. ...सविस्तर वाचा
16:33 (IST) 2 Jul 2025

CSMT-पनवेल लोकलमध्ये १५ दिवसांचे बाळ टाकून महिला झाली फरार, फरार आईचा वाशी रेल्वे पोलिसांकडून शोध सुरु

लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका अनोळखी महिलेने सामानासह लोकलमधून उतरता येणार नसल्याचा बहाणा करत आपल्या १५ दिवसांच्या बाळाला एका तरुणीकडे सोपवून स्वत: लोकलमधून न उतरता सदर लोकलमधून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूड्स रेल्वे स्थानकात घडला. वाशी रेल्वे पोलिसांनी १५ दिवसाच्या बाळाला सोडून पळून गेलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरु केला आहे.

त्यानुसार १५ दिवसाच्या बाळाला सोडून देणाऱ्या अज्ञात महिलेविरोधात बीएनएस कलम ९३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तसेच सीसीटीव्ही फुटेजवरुन सदर महिलेचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले. बाळाला सध्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, सदर बाळाला सोडून पळून गेलेल्या महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन देखील उंदरे यांनी केले आहे.

15:07 (IST) 2 Jul 2025

चंद्रशेखर बावनकुळेंचे भावनिक पत्र; प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त झाल्यावर लोकसभा निवडणुकीतील अपयशाचे…

भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. तब्बल तीन वर्षे अध्यक्षपदाची जबाबदारी मसहूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे होती.बावनकुळे यांनी जनता आणि कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहले आहे. ...वाचा सविस्तर
14:23 (IST) 2 Jul 2025

यवतमाळमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; पाच पिस्तूल, ३५० काडतूस, तलवार अन् बुलेटप्रूफ जॅकेटही….

यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठ्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. ...सविस्तर बातमी
14:20 (IST) 2 Jul 2025

Shiv Sena Symbol Dispute : महापालिका निवडणुकीपूर्वी 'धनुष्यबाण'वर निर्णय येणार? उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १४ जुलैला सुनावणी

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना निवडणूक चिन्हावर १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...वाचा सविस्तर
13:50 (IST) 2 Jul 2025

ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत काँग्रेस सहभागी होणार का? अतूल लोंढे म्हणाले....

महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी वादातून जीआर रद्द झाल्यानंतर आता ५ जुलैला शिवसेना यूबीटी आणि मनसे मराठी विजय दिवस साजरा करत आहे. परंतु, शिवसेनेच्या मित्र पक्ष काँग्रेसला अद्याप ही ५ जुलैचे निमंत्रण मिळालेले नाही.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले की, "आम्हाला अजून तसं काही निमंत्रण किंवा सांगण्यात आलेले नाही. कदाचित हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा इव्हेंट असू शकतो. ५ जुलै हा मोर्चा काढण्यासाठी दिवस ठरला होता. पण हा जीआर रद्द झाला आहे असं मला अजूनही वाटत नाही. कारण नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. त्यामुळे 'मुंह में राम, बगल में नाथूराम' या भाजपाच्या नितीपासून जपून राहणं आवश्यक आहे," असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

13:41 (IST) 2 Jul 2025

भाजपच्या गढात पक्ष विस्ताराला गेलेल्या शिंदेंवर नामुष्कीची वेळ

युवराज माथनकर नागपूरमध्ये कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर खंडणी, खून अशा गंभीर गुन्हे दाखल आहेत. ...वाचा सविस्तर
13:04 (IST) 2 Jul 2025

"महायुतीचा लाडका कंत्राटदार : मेघा इंजिनिअरिंग!", विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

अनेक महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते श्री. जयंतराव पाटील ह्यांनी मेघा इंजिनिअरिंगच्या भ्रष्टाचाराचा पाढा विधानसभेत मांडत आहेत, सरकारला जाब विचारत आहेत पण महायुती सरकार ह्या लाडक्या कंत्राटदाराला पाठीशी घालतंय उलटपक्षी त्याच कंत्राटदाराला हजारो कोटींची कंत्राटं देत सुटलंय... काय गौडबंगाल आहे हे? कुणाचा वरदहस्त आहे? ह्याच कंत्राटदारावर इतकी मेहरबानी का? मेघा इंजिनिअरिंगवरच इतकं प्रेम का उतू जातंय? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं ह्या महाराष्ट्राला दिवाळखोर भ्रष्ट सरकारला द्यावीच लागतील. म्हणून आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ‘लाडका कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंग’ असे फलक हातात घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी विधिमंडळ पक्षनेते व आमदार जयंत पाटील, विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अजय चौधरी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांच्यासह महाविकास आघाडीचे इतरही आमदार उपस्थित होते.

13:03 (IST) 2 Jul 2025

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निवास व्यवस्थेचे पोलिसांसमोर आवाहन

आगामी कुंभमेळ्याच्या पर्वणी व भाविकांची होणारी गर्दी पाहता २२ हजार पोलीस बंदोबस्त बाहेरून मागविण्यात येणार आहे. या शिवाय तीन हजार स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त राहणार आहे. ...अधिक वाचा
12:44 (IST) 2 Jul 2025

शिराळ्याच्या शिवाजीराव नाईकांचे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण 

शिवाजीराव नाईक यांनी दोन वर्षासाठी आ. जयंत पाटील यांच्याशी केलेला घरोबा मोडीत काढून पुन्हा सत्तेच्या मांडवाखाली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश करून एक वर्तुळ पूर्ण केले आहे. ...अधिक वाचा
12:40 (IST) 2 Jul 2025
काँग्रेसवरील आरोपांच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांची भाजपावर सडकून टीका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आव्हाड म्हणाले की, "इतिहास बदलणे आणि त्याची मोडतोड करून मांडणे हे भाजपाचे काम राहिले आहे. काँग्रेसने काय केलं याची माहिती ज्यांना नाही, त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं ठरेल. संविधान सभेत बाबासाहेबांना कोणी आणलं? ज्या समितीत ९० टक्क्यांहून जास्त लोक काँग्रेसचे होते, त्या काँग्रेसने मसूदा समितीचे अध्यक्ष कोणाला बनवले? मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते आणि हा निर्णय गांधी आणि नेहरूंनी घेतला होता. मग तुम्ही काय बोलत आहात? जर बाबासाहेबांना यातना झाल्या असतील तर त्या १९५० मध्ये जेव्हा हे म्हटलं गेलं की आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानत नाहीत, भारताचे संविधान मनुस्मृती आहे... याच मनुस्मृती १९२७ रोजी बाबासाहेबांनी जाळली होती. यातना तेव्हा होते जेव्हा जन्माला घातलेल्या बाळाची हत्या करण्याचा प्रयत्न होतो.... "

12:38 (IST) 2 Jul 2025

भविष्यातील भारतीय समाजरचनेविषयी विचारमंथनाची गरज; डॉ. अनिल काकोडकर यांची मुक्त विद्यापीठाकडून अपेक्षा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकोडकर यांनी मार्गदर्शन केले. ...सविस्तर वाचा
11:29 (IST) 2 Jul 2025

सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधी पक्षांची विधानसभेच्या पायऱ्यांवर निदर्शने

महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधी पक्षांनी (महाविकास आघाडी) विधानसभेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.

11:06 (IST) 2 Jul 2025

“सत्य बाहेर आले घशात गेले दात, उबाठानेच केला मराठीचा घात”, मुंबईत उद्धव ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आणि मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाविरोधात खळबळजनक बॅनर झळकले आहेत. "त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं... विसरलात की काय?" असा थेट सवाल या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तर सत्य बाहेर आले, घशात गेले दात उबाठानेच केला मराठीचा घात" अशा ओळी देखील या बॅनर वर देण्यात आल्या आहेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२०संदर्भात महाराष्ट्र शासनाने कार्यवाही करण्यास मान्यता दिली होती. या धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्र स्वीकारण्याची शिफारस झाल्यानंतर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन करण्यात आला होता. या कार्यगटाच्या शिफारशींचे सादरीकरणही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आले होते, असे बॅनरमधील मजकुरात म्हंटले आहे.

या बॅनरबद्दल अजूनही कोणत्याही नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राज्य सरकारने त्रिभाषा सक्ती कायदा काढल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढत विरोध करण्याची भूमिका मांडली होती. मात्र, राज्य शासनाकडून त्रिभाषा सक्तीचे निर्णय रद्द करण्यात आले होते व यानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा मोर्चा देखील रद्द झाला. मात्र, पाच तारखेला उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची विजयी सभा होणार आहे. त्या आधीच ही बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.