अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याोबतच कलाविश्वात आरोप-प्रत्यारोपाचा नवा खेळदेखील सुरु झाला आहे. त्यामुळे सध्या या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण मिळाल्याचं दिसून येत आहे. यामध्येच आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सुशांत आत्महत्याप्रकरणी वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामीला खलनायक म्हणत ताशेरे ओढले आहेत.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका केली आहे. तसंच अर्णब गोस्वामींसारख्या खलनायकांविरुद्धदेखील आवाज उठविला पाहिजे असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर काहींनी त्यांना ट्रोलदेखील केलं आहे.

“आदित्य चोप्रा, करण जोहर, महेश भट्ट, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासह अनेकांना माझा एक सल्ला आहे. केवळ चित्रपटांसाठी हिरो तयार करणं आणि चित्रपटात हिरो होणं इतकंच गरजेचं नाही. तर अर्णब गोस्वामीसारख्या खलनायकाविरुद्ध आवाज उठविणंदेखील तितकंच गरजेचं आहे”, असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणतात, “खरं तर ते आपल्याविषयी असं दाखवतायेत जसं काय आपण गुन्हेगार आहोत..बलात्कारी आहोत. त्यामुळे अशा काळात या लोकांचा थेट सामना करण्याची गरज आहे”.

दरम्यान, राम गोपाल वर्मा यांचं ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. तुमच्या लोकांपेक्षा ते नक्कीच चांगले आहेत. निदान त्यांच्यात माणुसकी तरी आहे. तुमच्यामध्ये तर तीदेखील नाही, असं एका युजरने म्हटलं आहे.