गेल्या कित्येक महिन्यांपासून अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल या जोडीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अखेर ही जोडी विवाहबंधनात बांधली जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या २४ जानेवारीला ही जोडी लग्नगाठ बांधणार असून दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा रंगणार आहे. मात्र, या समारंभात सहभागी होणाऱ्यांसाठी एक खास अट असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘बॉलिवूड लाइफ’नुसार, वरुण आणि नताशा यांचं लग्न अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. अलिबागमधील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे हा लग्नसोहळा संपन्न होणार असून सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

लग्नकार्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेचं तो खासगी रहावा यासाठी डेव्हिड धवन यांनी कळजी घेतली आहे. लग्न सोहळा संपन्न होत असलेल्या मॅन्शन हाऊसभोवती मोठ्या संख्येने सुक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेराही लावण्यात आले आहेत. सोबतच लग्नात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फोन वापरण्यास मनाई केली आहे. लग्नातील व्हिडीओ शूट होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा : अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्याविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे बिग बी ट्रोल

दरम्यान, या लग्नसोहळ्यात कलाविश्वातील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर असे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.