गेल्या आठवडय़ाभरात एकच चर्चा आहे ती अभिनेता सनी देओल आणि त्याच्या दोन दशकांच्या अंतराने प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ या यशस्वी सिक्वेलपटाची.. नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेता असलेल्या सनी देओलसाठी सत्तरीच्या उंबरठय़ावर असताना मिळालेले ‘गदर २’चे यश आणि प्रेक्षकांचे त्याच्या भूमिकेवरचे प्रेम हे सुखावून जाणारे ठरले आहे.

१९८३ साली प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘बेताब’ या पहिल्या चित्रपटापासून तिकीट खिडकीवर मिळणाऱ्या यशाच्या समीकरणांचा फारसा विचार न करता सतत काम करत राहिलेल्या या अभिनेत्याने ‘गदर’ आणि ‘गदर २’ या दोन चित्रपटांच्या काळात दोन पिढय़ा लहानाच्या मोठय़ा झाल्या आहेत, त्यांच्याकडूनही तुम्हाला मिळणारं प्रेम निश्चितच नवल करायला लावणारं आहे असं मत व्यक्त केलं.

दोन दशकांपूर्वी म्हणजे २००१ साली सुपरहिट झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाने देशातील प्रत्येकाच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. या चित्रपटातील गाणी, संवाद, दृश्यं आणि कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातील तारा सिंग आणि सकिनाच्या जोडीला आज इतक्या वर्षांनंतरही पसंती मिळते आहे. ‘यह ढाई किलों का हाथ..’ सारख्या संवादासाठी प्रसिद्ध असलेल्या सनी देओलची नायक म्हणून तीच प्रतिमा आजही प्रेक्षकांना जास्त भावते आहे. मात्र यामुळे आपण ठरावीक भूमिकांच्या चौकटीत अडकून पडलो.. असा कुठलाही विचार आपण करत नसल्याचे सनी देओलने ‘गदर २’च्या यशाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. खलनायकांना धुणारा नायक ही आपली प्रतिमा लोकांना आवडते ही गोष्ट चांगली आहे. मात्र मी त्या भूमिकांसाठीच ओळखला जातो यात माझी काही चूक नाही, असे त्याने सांगितले. ‘प्रेक्षकांना मी एका ठरावीक पद्धतीच्या भूमिकांमध्ये आवडतो आणि निर्माते – दिग्दर्शकही माझा एका पद्धतीच्या भूमिकांच्या दृष्टिकोनातूनच विचार करतात. एक कलाकार म्हणून फार चोखंदळ न राहता अभिनय करत राहिलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि कोणताही कलाकार घेतला तरी तो कुठल्या ना कुठल्या प्रतिमेत अडकलेलाच असतो’, असं सांगतानाच आपले वडील मात्र त्याला अपवाद असल्याचंही त्याने कबूल केलं. ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र हे खरोखरच अष्टपैलू अभिनेते आहेत, असं त्याने सांगितलं.

पहिला निर्णय नेहमीच योग्य असतो..

अनेक वर्षांनंतर ‘गदर २’ हा चित्रपट करायचा निर्णय कसा घेतला? याविषयी बोलताना ‘मी ‘गदर २’ ची तयारी करताना मनातून खूप घाबरलो होतो, कारण २००१ साली आलेला ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट लोकांचा होता, हाही चित्रपट लोकांना तितकाच आपलासा वाटायला हवा अशी इच्छा होती. मात्र तसेच होईल का याबद्दल साशंकता होती, असे त्याने सांगितले. मात्र एवढय़ा वर्षांत मला ‘गदर’ व्यतिरिक्त आणखी कोणत्याही चित्रपटासाठी अशी कथा कधीच मिळाली नाही जिच्यासाठी मी लगेच तयार होईन, असेही त्याने सांगितले. अनिल शर्मा यांनी ‘गदर २’ची कथा ऐकवली तेव्हा माझे डोळे पाणावले होते. मी कथा ऐकून काही मिनिटांतच चित्रपट करण्यासाठी होकार दिला होता, असं सांगतानाच आपण पहिला निर्णय जो घेतो तो नेहमीच योग्य असतो, त्यामुळे हा निर्णयही योग्य ठरल्याचे त्याने सांगितले. ‘गदर २’ खास असल्याने गेल्या चाळीस वर्षांत कुठल्याही चित्रपटासाठी केले नसतील इतके प्रसिद्धी कार्यक्रम देशभरात केल्याचेही सनी देओलने सांगितले.

आणि वडिलांनी मला घट्ट मिठ्ठी मारली..

‘गदर – २’ पाहून ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांची काय प्रतिक्रिया होती हा प्रश्न विचारला तेव्हा खरंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी मुळात स्वत:ची अवस्थाही अशीच तुफान आनंदाची होती असं त्याने सांगितलं. ‘हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित झाला त्या दिवशी मी मनापासून खूश होतो. खूप हसत होतो, अचानक मला रडायलाही येत होतं. माझी अवस्था बघून घरचेही गोंधळले होते, तेव्हा मी त्यांना मला खूप आनंद झाला आहे असं सांगितलं. हा चित्रपट बघताना बाबाही या चित्रपटाचा मनापासून आनंद घेत होते. चित्रपट बघताना ते भावुक होत होते, हसत होते. चित्रपट पाहून झाल्यावर काहीही न बोलता त्यांनी मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या मिठीतूनच मला समजलं त्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे’ असा अनुभवही सनीने यावेळी सांगितला.

बॉलीवूड कशासाठी?..

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीचा उल्लेख सर्रास बॉलीवूड म्हणून केला जातो हे आपल्याला खटकत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. आपला देश हा कलेचे भांडार आहे. आपल्या देशात अनेक कलापरंपरा आपण जोपासत आलो आहोत, त्यावरच आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपल्या चित्रपटातूनही या कलापरंपरा, आपली संस्कृती, सभ्यता प्रतिबिंबित झाली पाहिजे तरच ती या तरुण पिढीपर्यंत पोहोचेल, असं मत त्याने व्यक्त केलं. त्याची सुरुवात म्हणून मुळात पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावातून आलेल्या हॉलीवूड संकल्पनेवर आधारित आपल्या चित्रपटसृष्टीचा बॉलीवूड हा उल्लेख टाळला पाहिजे. आपण पूर्वीपासूनच हिंदी चित्रपटसृष्टी म्हणूनच ओळखत होतो आणि तोच आदर कायम ठेवला पाहिजे, असं स्पष्ट मत त्याने व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गदर २’च्या यशानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ‘गदर ३’ ची घोषणा केली आहे. शिवाय, प्रेक्षकांकडून सातत्याने देओल कुटुंबांची भूमिका असलेल्या ‘यमला पगला दिवाना’ आणि ‘अपने’ या चित्रपटांच्या सिक्लेवपटांविषयी सातत्याने विचारणा होते आहे. त्यापैकी ‘अपने २’ची तयारी सुरू करण्यात येणार असल्याचे सनीने सांगितले.