आमिर खानने नुकतंच त्याचा भाचा अभिनेता इमरान खानच्या बॉलीवूडमधील करिअरबद्दल वक्तव्य केलं आहे. इमरान खानने ‘जाने तू या जाने ना’ या २००८ साली आलेल्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. यानंतर त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं, पण गेली अनेक वर्षे तो कुठल्याही नवीन चित्रपटात झळकलेला नाही.
आमिर खानने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत इमरान खान व त्याच्या बॉलीवूडमधील करिअरबद्दल सांगितलं आहे. आमिर म्हणाला, “इमरानला अभिनेता व्हायचं आहे स्टार नाही. त्याला हिरोगिरीमध्ये रस नाही, तो खूप क्रिएटिव्ह आहे. त्याची अभिनयशैली वेगळी आहे, त्यामुळे तो हिरोगिरी असलेल्या सिनेमांमध्ये फिट बसत नाही. दिसायला हँडसम असल्याने अनेकदा त्याला अशा चित्रपटांसाठी विचारणा झाली. पण, त्याला नैसर्गिक अभिनय असलेल्या वास्तविक भूमिका साकारायला आवडतात म्हणून ‘जाने तू या जाने ना’ आणि ‘देली बेली’मध्ये त्याने उत्कृष्ट काम केलं होतं.”
इमरान खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने आमिर खानच्या लहानपणातील भूमिका साकारली होती. ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’ यांसारख्या आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटांमध्ये इमरानने काम केलं आहे.२००८ साली त्याने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेत्री जिनिलीया देशमुखसह तो यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. यानंतर तो ‘किडनॅप’, ‘लक’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘ब्रेक के बाद’, ‘देली बेली’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘एक में और एक तू, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’, ‘गोरी तेरे प्यार में’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला होता. त्याने शेवटचं ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात कंगना रणौतबरोबर काम केलं होतं. २०१५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यानंतर तो अद्याप कुठल्याही नवीन चित्रपटात झळकलेला नाही.
दरम्यान, आमिर खानबद्दल बोलायचं झालं तर येत्या २० जूनला त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामधून आमिर व जिनिलीया देशमुख पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. तर नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आमिरने जिनिलीयाच्या कामाचं कौतुक केलं होतं. २० जूनला ‘सितारे जमीन पर’ प्रदर्शित झाल्यानंतर आमिर त्याचं ड्रिम प्रोजेक्ट महाभारतवर काम करणार असल्याचं त्याने राज शमानीला दिलेल्या मुलाखतीमधून सांगितलं होतं. यामधून अभिनेत्याने महाभारत हा कदाचित त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो असंही म्हटलं होतं