Karisma Kapoor First Post after Ex Husband Sunjay Kapur Death: बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. करिश्माचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचं १२ जून २०२५ रोजी निधन झालं. संजय लंडनमध्ये पोलो खेळत होते, तेव्हा त्यांच्या घशात मधमाशी अडकली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. संजय यांच्या निधनानंतर दोन आठवड्यांनी करिश्मा कपूरने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
संजय कपूर यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व होते आणि त्यांचं निधन इंग्लंडमध्ये झालं, त्यामुळे त्यांचे पार्थिव भारतात यायला एक आठवडा उलटला. संजय कपूर यांच्यावर १९ जून रोजी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला करिश्मा कपूर तिची मुलगी समायरा व मुलगा कियान यांना घेऊन गेली होती. करिश्माबरोबर करीना कपूर व तिचा पती सैफ अली खानही गेले होते. त्यानंतर दिल्लीत संजय कपूर यांची प्रार्थनासभा ठेवण्यात आली होती. तिथेही करिश्मा गेली होती.
संजय कपूर यांचं निधन १२ जूनला झालं. २५ जूनला करिश्मा कपूरचा वाढदिवस होता. संजय यांचं निधन झाल्यानंतर करिश्माने एकही पोस्ट केली नव्हती. आता दोन आठवड्यांनंतर संजय कपूर यांच्या निधनानंतर तिने इन्स्टाग्रामवर पहिल्यांदाच पोस्ट केली आहे.
करिश्माने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे व तिला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. “शुभेच्छा व पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार,” असं करिश्माने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
करिश्मा कपूरची पोस्ट

संजय कपूर यांनी तीन लग्नं केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव नंदिता महतानी होतं. लग्नानंतर ४ वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला होता. करिश्मा कपूर ही संजय कपूर यांची दुसरी पत्नी होती. करिश्माने २००३ साली अभिषेक बच्चनबरोबरचा साखरपुडा मोडल्यानंतर काही महिन्यांनी संजय कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर तिला समायरा व कियान ही दोन मुलं झाली. २०१४ मध्ये करिश्माने संजय यांच्यावर गंभीर आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
संजय मारहाण करतात, हनिमूनला त्यांनी त्यांच्या मित्रांबरोबर रात्र घालवायला भाग पाडलं होतं, असे आरोप करत करिश्माने घटस्फोट मागितला होता. संजय यांनी त्यांच्या आईला आपल्याला मारायला सांगितलं, असा दावाही करिश्माने केला होता. दोन वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर २०१६ मध्ये करिश्मा व संजय विभक्त झाले. त्यानंतर संजय यांनी प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं. प्रिया व संजय यांना एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर तिसरं लग्न करूनही संजय यांना आपल्या मुलांबद्दल खूप प्रेम होतं. ते प्रत्येक सण-उत्सव मुलांबरोबर साजरे करायचे. समायरा व कियान बरेचदा त्यांच्या वडिलांबरोबर राहायचे. संजय यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. वडिलांना शेवटचं पाहताना कियानला अश्रू अनावर झाले होते.