सैफ अली खान (Saif Ali Khan)ने त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा नक्की काय झाले होते, करीना व मुलांची प्रतिक्रिया काय होती, तैमूरला त्याच्याबरोबर दवाखान्यात का नेले, जर तो पुन्हा त्याच परिस्थितीत अडकला तर तो काय वेगळे करेल, हल्लेखोराविषयी त्याला काय वाटते अशा अनेक बाबींवर त्याने वक्तव्य केले आहे. हल्ल्यानंतर सैफ अली खानने लीलावती रुग्णालयात धाव घेतली होती. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचा मुलगा तैमूर होता. विशेष बाब म्हणजे एका ऑटो रिक्षामधून तो रुग्णालयात गेला होता.

हल्ल्यानंतर मुलांची प्रतिक्रिया काय होती?

सैफ अली खानने नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने हल्ला झाल्यानंतर मुलांची प्रतिक्रिया काय होती, यावर बोलताना म्हटले की, माझ्या लहान मुलाने म्हणजे जेहने मला त्याची प्लास्टिकची तलवार दिली. ती तलवार मी माझ्या बेडवर ठेऊ शकतो व पुन्हा जर चोर आला तर त्याचा सामना करू शकतो, असे त्याचे म्हणणे होते. करीनाला धक्का बसला होता. त्या घटनेनंतर करीना व तैमूर जास्त चिंतेत आहेत. असे असले तरी या सर्व प्रसंगाला करीना मोठ्या धैर्याने सामोरी गेली. याबरोबरच, इब्राहिम व सारा दोघेही खूप भावूक झाले होते; त्यांनी माझ्याबरोबर खूप वेळ घालवला, असे म्हणत सैफ अली खानने त्याच्या मुलांना त्याची चिंता लागल्याचे म्हटले.

सैफ अली खानने त्याच्या सुरक्षेबाबत बोलताना म्हटले की, मी कधीच जास्त सुरक्षारक्षकांमध्ये राहत नाही. नेहमी तीन-चार बॉडीगार्डच्या सुरक्षेत राहणे, फिरणे हे मला दु:खद स्वप्नासारखे वाटते. याबरोबरच ज्याने माझ्यावर हल्ला केला त्याला कल्पना नसावी, आपण कोणाच्या घरात घुसखोरी करत आहे.

सैफ अली खानने याच मुलाखतीत खुलासा केला की, तैमूरने त्याला हल्लेखोराला माफ करावे असे सांगितले होते. अभिनेत्याने पुढे म्हटले, मलाही सुरुवातीला माझ्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीसाठी वाईट वाटले. पण, नंतर मला जाणीव झाली की त्याने माझ्यावर अनेकदा चाकूने वार केले, ज्यामुळे माझ्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर मला त्याच्याविषयी वाईट वाटणे बंद झाले. त्याने हे सर्व का केले हे मी समजू शकतो. त्याने माझ्यावर चाकूने वार करून त्याची मर्यादा ओलांडली. याबरोबरच अभिनेत्याने पुढे असेही म्हटले की, माझ्यावर जो हल्ला झाला त्यासाठी मी समाज अथवा पोलिसांना जबाबदार धरत नाही. माझ्या घरातील ती जागा व्यवस्थित बंद करण्याची जबाबदारी माझी होती. सैफ अली खानने म्हटले की माझे वडील त्यांच्याजवळ बंदूक घेऊन झोपत असत. मात्र, मला असे वाटते की यामुळे अपघात होऊ शकतात किंवा ती बंदूक मुलांच्या हाती लागू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या हल्ल्यानंतरही सैफ अली खानने मुंबई ही राहण्यासाठी सुरक्षित असल्याचे म्हटले. या हल्ल्याने माझे जीवन बदलू शकत नाही आणि असे जरी झाले तर ते चुकीचे असल्याच्या भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत.