दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा अभिनेता बाबिल खान सध्या चर्चेत आहे. खरं तर, काल त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो रडत होता आणि बॉलीवूड खूप वाईट आहे, असं म्हणत होता.
बाबिलने आपल्या व्हिडीओमध्ये अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, अर्जुन कपूर, राघव जुयाल व शनाया कपूरसह अनेक कलाकारांची नावं घेतली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाबिलनं त्याचे इन्स्टाग्राम डिलीट केले होते. पण, नंतर त्यानं ते पुन्हा सुरू केलं.
यादरम्यान अभिनेता हर्षवर्धन राणे यानं बाबिल खानला दारू आणि इतर गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करीत हर्षवर्धन म्हणाला, “प्रिय बाबिल खान, तुला देवाच्या कृपेनं अभिनयाचा वारसा मिळाला आहे. तू हा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. या कलाकृतीला तुझं सर्वोत्तम दे. पार्टी आणि कार्यक्रमांपासून तू दूर राहा; जेणेकरून गरज नसणाऱ्या लोकांशी संवाद टाळता येईल.”
हर्षवर्धनने दिला सल्ला
हर्षवर्धन पुढे म्हणाला, “जर तुम्ही लोकांना परवानगी दिली नाही, तर लोक तुमच्याशी वाईट वागणार नाहीत.” तुम्हाला तुमच्या भूमिकेवर ठाम राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या पायांवर उभं राहण्याची गरज आहे. काळजी घे”.
बाबिलच्या या व्हिडीओवर त्याच्या कुटुंबानं निवेदन जारी केलं होतं. त्यामध्ये त्याच्या घरच्यांनी, “एका व्हिडीओचा आणि त्याच्या शब्दांचा गैरसमज झाला. या व्हिडीओमध्ये बाबिल त्याच्या काही सहकाऱ्यांचं प्रामाणिकपणे कौतुक करताना दिसत आहे. अनन्या पांडे, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव, अर्जुन कपूर व अरिजित सिंग यांसारख्या अभिनेत्यांची नावं त्यानं घेतली. कारण- तो त्यांना मानतो. पण, त्याच्या अर्धवट व्हिडीओमुळे हा गैरसमज झाला” असं म्हटलं आहे.
बाबिल हा इरफान आणि सुतापा सिकदर यांचा मुलगा आहे. त्यानं ‘काला’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तो ZEE5 वर प्रदर्शित झालेल्या ‘लॉगआउट’मध्ये शेवटचा दिसला होता.