करण जोहरच्या ‘दोस्ताना-२’ मधून कार्तिक आर्यनचा पत्ता कट झाल्यानंतर आता कार्तिकची जागा कोण घेणार असा प्रश्न निर्मात्यांसमोर आहे. त्यानंतर अभिनेता विकी कौशल आणि राज कुमार राव कार्तिकची जागा घेणार अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, करण जोहरने बॉलिवूडचा खिलाडी कुमार अभिनेता अक्षय कुमारला चित्रपटात कार्तिकच्या जागी येण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, करण जोहरने अशा कठीण काळात अक्षयची मदत मागितली आहे, कारण त्यांच्याकडे चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी कोणताही कलाकार नाही. या आधीच करणने या चित्रपटाच्या चित्रीकरणावर अफाट पैसा खर्च केला आहे.

करण या चित्रपटाती पटकथा ही बदलण्यासाठी तयार असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरने सोशल मीडियावर एक पोस्ट करत कार्तिकला ‘दोस्ताना २’ मधून काढून टाकल्याची माहिती दिली होती. ‘धर्मा प्रोडक्शन’ने देखील ट्वीट करत याची माहिती दिली होती. यात त्यांनी काही कारणांमुळे कार्तिकला ‘दोस्ताना २’ मधून काढल्याचे सांगितले होते. सोबतच ते पुन्हा एकदा या चित्रपटासाठी कलाकारांची निवड करत असल्याची माहिती त्यांनी दिली होती. या पुढे धर्मा प्रोडक्शन आणि कार्तिक आर्यन या पुढे कधीच एकत्र काम करणार नाही असे देखील सांगण्यात येत आहे.

‘दोस्तना २’ या चित्रपटाची घोषणा ही २०१९ मध्येच झाली होती. करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे त्याचे चित्रीकरण करता आले नव्हते. या चित्रपटात कार्तिक सोबत मुख्य भूमिकेत जान्हवी कपूर दिसणार होती. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दोस्ताना’ या चित्रपटाचा सिक्वल ‘दोस्ताना २’ आहे.