‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व इंडियन आयडॉल फेम गायक आशिष कुलकर्णी यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात थाटामाटात पार पडला होता. या दोघांच्या हळद, मेहंदी व लग्नसोहळ्यातील असंख्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर या दोघांनी पहिल्यांदाच राजश्री मराठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक खुलासे केले.

स्वानंदी टिकेकर ही मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची लेक आहे. त्यामुळे स्वानंदी-आशिषच्या रिलेशनशिपबद्दल त्यांना समजल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती याबद्दल अभिनेत्रीने या मुलाखतीत खुलासा केला आहे. स्वानंदी म्हणाली, “रोहित-जुईलीच्या घरी आमची पहिली भेट झाली. त्यानंतर मैत्री अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या घरातून लग्नाबद्दल सारखी विचारणा केली जात होती. आई अमेरिकेला कॉन्सर्टला गेली होती तिकडून ती मुलांचे फोटो पाठवून बघून घे वगैरे मला सांगायची. शेवटी आशिषने त्याच्या घरी सांगितल्यावर मी एक महिन्याने माझ्या घरी या नात्याबद्दल सांगण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : तळहाताएवढी आहे आयरा खान-नुपूर शिखरेच्या रिसेप्शन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, फोटो पाहिलात का?

स्वानंदी पुढे म्हणाली, “आईला फोन करून मी आशिषबद्दल कल्पना दिली होती. तसंच त्याने लग्नासाठी मला विचारलंय असंही मी आईला सांगितलं. आई-बाबांना आमच्याबद्दल समजलं तेव्हा दोघांनी मिळून इंटरनेटवर आशिषची अख्खी कुंडली वाचली. एका दिवसात त्यांनी त्याच्याबद्दल सगळी माहिती मिळवली होती.”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेचे दिग्दर्शक अडकले विवाहबंधनात, प्रियाने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष याबद्दल सांगताना म्हणाला, “स्वानंदीच्या घरी समजल्यावर दुसऱ्या दिवशी मला उदय टिकेकरांचा फोन आला. ते पहिल्यांदा व्हिडीओ कॉलवर माझ्याशी बोलले. तू फारच सुंदर गातोस, आज संपूर्ण दिवस मी तुझी गाणी ऐकली. अजून थोडं उच्चारांवर काम कर, ते एवढंच फोनवर म्हणाले आणि त्यांनी सगळ्या गोष्टीला परवानगी दिली. आमच्या दोघांचे पालक पहिल्यांदा भेटले तेव्हा सुद्धा सगळं सुरळीत झालं. एका दिवसात त्यांनी साखरपुड्याची तारीख निश्चित केली होती. हे सगळं आठवून आताही खूप छान वाटतंय.”