मुंबई : राज्यातून निवडून येणारे खासदार एके काळी ‘मौनी खासदार’ म्हणून प्रसिद्ध होते. पण ही परिस्थिती कालांतराने बदलत गेली. राज्यातून लोकसभेत निवडून आलेले खासदार आता अधिक सक्रिय झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी निवडून आलेल्या राज्यातील खासदारांनी लोकसभेतील एकू ण प्रश्नांपैकी २९ टक्के प्रश्न विचारले आहेत. यात राज्यातील भाजप खासदारांच्या प्रश्नांचे प्रमाण ४५ टक्के तर शिवसेना खासदारांचे प्रमाण हे ३७ टक्के आहे.
लोकसभेची निवडणूक मे २०१९ झाली व त्यानंतर दोन वर्षांत लोकसभेची पाच अधिवेशने झाली. करोना संकटामुळे गेल्या वर्षभरात कामकाजावर परिणाम झाला. हिवाळी अधिवेशनात तर प्रश्नोत्तराचा तासच रद्द करण्यात आला व त्यावरून सरकारवर टीकाही झाली होती. गेल्या दोन वर्षांत राज्यातील खासदारांनी किती प्रश्न विचारले याचे प्रगती पुस्तक ‘संपर्क ’ या संस्थेने तयार के ले आहे. पाच अधिवेशनांमध्ये एकू ण २३,९७९ प्रश्न विचारण्यात आले वा सभागृहाच्या पटलावर आले. यापैकी ६,९४४ प्रश्न हे राज्यातील खासदारांनी विचारले आहेत. राज्यातून लोकसभेवर ४८ खासदार निवडून येतात. लोकसभेतील एकूण प्रश्नांच्या तुलनेत राज्यातील खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांचे प्रमाण हे २९ टक्के आहे. राज्यातून सात महिला खासदार निवडून आल्या आहेत व या महिला सदस्यांनी ९९८ प्रश्न विचारले. राज्यातून निवडून आलेल्या खासदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक २४ खासदार आहेत.
सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी ३,११६ म्हणजेच ४५ टक्के प्रश्न विचारले आहेत. १७ खासदार असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी २,५३९ प्रश्न विचारले आणि त्याचे प्रमाण ३७ टक्के होते. चार सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी १४ टक्के प्रश्न विचारले होते. जातप्रमाण पत्रावरून अडचणीत आलेले सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वार महास्वामी हे राज्यातील खासदारांमध्ये लोकसभेत सर्वात कमी प्रश्न विचारणारे खासदार आहेत. सर्वाधिक प्रश्न हे राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विचारले आहेत. त्यांनी ३१३ प्रश्न विचारले आहेत.
सात महिला खासदारांची कामगिरी
सुप्रिया सुळे – ३१३, डॉ. हिना गावित – २४०, प्रीतम मुंडे – १५७, पूनम महाजन – १३०, भारती पवार – १०९, नवनीत राणा – २८,
भावना गवळी – २१
सर्वाधिक प्रश्न विचारणारे पाच खासदार
सुप्रिया सुळे (बारामती- राष्ट्रवादी) – ३१३, ़डॉ. सुभाष भामरे (धुळे- भाजप) – ३०६, डॉ. अमोल कोल्हे (शिरुर- राष्ट्रवादी) – ३०६, श्रीरंग बारणे (मावळ- शिवसेना) – २९८, गजानन कीर्तीकर (उत्तर पश्चिम मुंबई – शिवसेना) – २९०.
कमी प्रश्न विचारणारे
डॉ. जयसिद्देश्वार महास्वामी (सोलापूर – भाजप) – २०, भावना गवळी (यवतमाळ- शिवसेना) – २१, नवनीत राणा (अमरावती – अपक्ष ) – २८, सुनील मेंढे (भंडारा-गोंदिया- भाजप) – ६६
पक्षनिहाय…
भाजप – २४ खासदार – प्रश्नसंख्या – ३११६ (एकू ण प्रश्नांच्या ४५ टक्के ), शिवसेना – १७ खासदार – प्रश्नसंख्या – २५३९ (३७ टक्के ), राष्ट्रवादी काँग्रेस – ४ खासदार – ९५९ (१४ टक्के ), काँग्रेस , एमआयएम आणि अपक्ष खासदार – प्रत्येकी दोन टक्के प्रश्न