शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजूर केला. यानंतर मन्नतवर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. इतरवेळी शाहरूख खान मन्नतच्या बालकनीत येऊन जमलेल्या चाहत्यांना हात हालवत अभिवादन करताना दिसलाय. मात्र, यावेळी आर्यनच्या जामिनाची बातमी ऐकल्यावर आर्यनचा लहान भाऊ अबराम मन्नतवरील बालकनीकडे धावला आणि त्याने बाहेर जमा झालेल्या चाहत्यांना हात हालवत अभिवादन केलं.

इतर वेळी लाजाळू असणारा आणि माध्यमांपासून, कॅमेरापासून दूर राहणारा अबराम यावेळी मात्र आनंदाने माध्यमांसमोर येताना दिसला. त्यानं बराच वेळ मन्नतच्या बालकनीतून चाहत्यांना हात दाखवत अभिवादन केलं. यानंतर त्याला घरात नेण्यात आलं.

अबराम चाहत्यांना हात हालवत अभिवादन करताना त्याच्यासोबत एक मित्रही होता. ते दोघेही बालकनीत वर चढून खाली जमलेल्या चाहत्यांकडे पाहत होते. यानंतर घरातील दायीने अबरामला खाली उतरवलं. मात्र, त्यानंतरही तो वारंवार बालकनीत येऊन चाहत्यांना अभिवादन करत होता. अबरामचा हा आनंद पाहून दायीलाही आनंद झालेला पाहायला मिळालं.

हेही वाचा : Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला अखेर जामीन, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक चाहत्यांनी तर मन्नतसमोर येऊन फटाके फोडत आनंद व्यक्त केला. इतर ठिकाणी देखील हेच चित्र पाहायला मिळालं.

आर्यन खानसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?

वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.”

“क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक, मग केवळ आर्यन आणि अरबाजचा संबंध कसा?”

“क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक हजर होते. असं असताना एनसीबीने केवळ आर्यन आणि अरबाजमध्येच संबंध असल्याचं सांगितलंय. हा षडयंत्राचा आरोप योगायोग नाही, तर कटाचा भाग आहे. जहाजावर कुणाच्याही भेटीगाठी झालेल्या नाहीत त्यामुळे याला षडयंत्र म्हणता येणार नाही. हे सर्व एकत्र भेटणार आहेत, तेथे त्यांना ड्रग्ज मिळणार आहे आणि मग ते ड्रग्जचं सेवन करणार आहेत अशी चर्चा नाही. त्यामुळेच हा कट आहे,” असं मत रोहतगी यांनी व्यक्त केलं.

“जहाजावर कोणत्याही भेटीगाठी नाही, त्यामुळे षडयंत्र म्हणता येणार नाही”

“जर एखाद्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये लोक आहेत. त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं तर ते सर्व लोक षडयंत्राचा भाग आहेत असं म्हणता येईल का? या प्रकरणात षडयंत्र म्हणावं असा कोणताही पुरावा नाही. आर्यन केवळ अरबाजला ओळखत होता. याशिवाय इतर कुणालाही ओळखत नाही. तेथे सर्वांची भेट झाली हे सिद्ध करणं कठीण आहे. मात्र, वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. षडयंत्र आहे हे दाखवण्यासाठी बैठक किंवा भेट होणं गरजेचं आहे. तिथं जाणीवपूर्वक ६ ग्रॅम ड्रग्ज सोबत बाळगलं असू शकतं. त्याचा षडयंत्राशी काहीही संबंध नाही.” असंही मुकुल रोहतगी यांनी नमूद केलं.