मुंबई: राज्यातील अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्यांक कोटा व व्यवस्थापन कोट्यातील जागांव्यतिरिक्त शिल्लक राहणाऱ्या जागांवर खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिले जात हाते. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये कोणत्याही जातीच्या विद्यार्थ्याला खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागत असेत. मात्र नव्या शैक्षणिक वर्षांत या नियमात बदल करण्यात आला असून त्यामुळे अकरावी प्रवेशामध्ये अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये शिल्लक जागांचेही सामाजिक आरक्षणानुसार वर्गिकरण करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे अकरावी संकेतस्थळावर प्रवर्गनिहाय जागांची विभागणी करण्यात आली आहे.

राज्यात मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, सिंधी अशा समाजासाठी अल्पसंख्यांक दर्जा असलेली महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. अकरावी प्रवेशादरम्यान अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये राखीव असलेल्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के जागा राखीव असायच्या, तर ५ टक्के जागा व्यवस्थापन कोट्यासाठी राखीव असायच्या. उर्वरित ४५ टक्के जागांवर खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिले जायचे. तसेच अल्पसंख्याकांसाठी राखीव असलेल्या जागांवर पुरेशा विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्या जागा खुल्या प्रवर्गासाठी वर्ग केल्या जात. मात्र राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या शिफारशीनुसार उर्वरित बिगर-अल्पसंख्याक जागांवर आरक्षण लागू करण्याच्या निर्णयाची यंदा शालेय शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार नव्या शैक्षणिक वर्षामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक महाविद्यालयातील कोट्यातील जागा वगळता अन्य जागांवर आता आरक्षण लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी १३ टक्के, अनुसूचित जमातीसाठी ७ टक्के, विमुक्त जातीसाठी तीन टक्के, भटक्या जमाती (ब) २.५ टक्के, भटक्या जमाती (क) ३.५ टक्के, भटक्या जमाती (ड) २ टक्के, इतर मागासवर्गीयांसाठी १९ टक्के, विशेष मागासवर्गीयांसाठी २ टक्के, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्ग १० टक्के, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय १० टक्के याप्रमाणे हे आरक्षण उर्वरित जागांसाठी लागू करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने ६ मे रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये ही बाब नमूद केली असली तरी यामध्ये स्पष्टता नव्हती. त्यातच २ जून रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्येही अल्पसंख्यांक महाविद्यालयांमधील या आरक्षणाचा मुद्दाच वगळण्यात आला आहे. मात्र अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर आरक्षण दाखविण्यात आल्याने कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पसंख्यांक विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार अल्पसंख्यांक महाविद्यालयांतील कोट्याव्यतिरिक्त जागांवर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संकेतस्थळावर दाखवण्यात येणाऱ्या वर्गवारीप्रमाणे पहिल्या फेरीसाठी आरक्षण लागू असेल. तसेच पुढील फेऱ्यांसाठी लवकरच सुधारित पत्रक काढण्यात येणार आहे.- डॉ. श्रीराम पानझाडे, प्रभारी शिक्षण संचालक, माध्यमिक