मुंबई : मध्य रेल्वेवरील बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा तब्बल सव्वा तास ठप्प झाली. ही घटना सोमवारी दुपारी १२.५५ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला. तर, कल्याणवरून कर्जत-खोपोली दिशेने जाणारी लोकल सेवा कुर्मगतीने धावल्या.
रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारी सकाळीही कायम होता. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्याचा फटका लोकल सेवेला बसला. डहाणू रोड, विरार, बोरिवलीवरून चर्चगेटच्या दिशेने आणि कर्जत, खोपोली, अंबरनाथ, बदलापूर, कसारा, आसनगाव, टिटवाळा, कल्याण, ठाणे, पनवेल, नेरुळ वाशीवरून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला. त्यात बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली.
मुसळधार पावसामुळे सकाळपासून लोकल आणि लांब पल्लाच्या रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या. दुपारच्या सुमारास मालगाडीमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा पूर्णपणे बंद झाली. यावेळी दोन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात आल्या. या लोकल अंबरनाथ येथे रद्द करून, पुन्हा कर्जतच्या दिशेने चालविण्यात आल्या.
मध्य रेल्वेचे म्हणणे काय…
सीएसएमटीकडे जाणाऱ्या एका मालगाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने, मालगाडी थांबली होती. यावेळी सहाय्यक इंजिन पाठवण्यात आले. त्यानंतर दुपारी २.१६ वाजेच्या दरम्यान ही मालगाडी मार्गस्थ करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
प्रवासी हैराण
कर्जतवरून सीएसएमटीकडे येणारी लोकलसेवा बंद झाल्याने, प्रवासी खोळंबले. तसेच वांगणी, भिवपुरी, कर्जत या दरम्यान लोकल एका मागे एक थांबल्या होत्या. लोकल बराचवेळ मार्गस्थ होत नसल्याने प्रवासी त्रस्त झाले होते.
कसारा आणि कर्जतवरून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. तसेच या मार्गावरील धीम्या लोकलला अर्धजलद किंवा जलद करून सीएसएमटीच्या दिशेने चालवण्यात आल्या. ऐनवेळी लोकल वेळापत्रकात बदल केल्याने, धीम्या मार्गावरील प्रवाशांना लोकलसाठी वाट पाहावी लागली.