लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख बनलेल्या बेस्ट उपक्रमाच्या परिवहन खात्यातील ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ११८९ बसगाड्या उरल्या असून त्या तुलनेत कंत्राटदाराकडून भाडेतत्वावर घेतलेल्या खासगी बसगाड्यांची संख्या अधिक आहे. मात्र कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांची अधूनमधून होणारी आंदोलने, खासगी बसगाड्यांमध्ये वारंवार होणारे बिघाड, बसगाड्यांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ आदी विविध कारणांमुळे प्रवाशांना थेट फटका बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी कामगार संघटनांकडून होऊ लागली आहे.

मुंबईकरांना किफायतशीर वाहतूक सेवा पुरविणारा उपक्रम असा बेस्ट उपक्रमाचा नावलौकीक आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाचा आर्थिक डोराला डळमळू लागला आहे. परिणामी, बेस्ट उपक्रमाला वेळोवेळी मुंबई महानगरपालिकेकडून मदत घ्यावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेस्टच्या बसगाड्या वेळेवर थांब्यावर पोहोचत नसल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. याबाबत प्रवाशांबरोबरच आता कामगार संघटनांनीही आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-मोकळी मैदाने, क्रीडांगणांचे दत्तक धोरण : नागरिकांच्या केवळ १०० सूचना, हरकती सादर

बेस्ट वर्कर्स युनियन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार बेस्ट उपक्रमाला ७७०० खासगी बसगाड्या चालविण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या ३,३३७ बसगाड्या असतील, असे निश्चित करण्यात आले होते. मात्र बेस्टच्या ताफ्यात आतापर्यंत खासगी कंत्राटदाराच्या १,७६४ बसगाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र कंत्राटदाराच्या १,७६४ पैकी काही नादुरुस्त बसगाड्या बेस्टच्या आगारांमध्ये उभ्या आहेत. वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या ४,३०० बसगाड्या होत्या. आयुर्मान संपुष्टात आल्यामुळे बहुसंख्य बसगाड्या ताफ्यातून बाद कराव्या लागल्या. आजघडीला स्वमालकीच्या १,१८९ बसगाड्या मुंबईकरांच्या सेवेसाठी धावत आहेत. कंत्राटदाराच्या भाडेतत्वावरील बसगाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत असून कंत्राटदाराचे कर्मचारी अधूनमधून करीत असलेल्या आंदोलनाचा फटका प्रवाशांना सोसावा लागत आहे. मुळातच बेस्टच्या ताफ्यात खासगी आणि स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या रोडावली आहे. परिणामी, प्रवाशांना बस थांब्यांवर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या तातडीने वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली आहे.

आणखी वाचा-पश्चिम रेल्वे विस्कळीत, लोकलला २० ते २५ मिनिटे विलंब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे. मात्र महानगरपालिका आणि बेस्टकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नसून आजही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. लाखो प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या अपुऱ्या बसगाड्यांचा प्रश्न शासन दरबारी मांडून उपक्रमाला आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी सामंत यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.