मुंबई : कांदिवली पूर्व येथे हनुमान नगर परिसरात महिलांसाठी फिरते स्नानगृह तयार करण्यात आले आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदर स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. झोपडपट्टीमधील भगिनींना सदर स्नानगृहांचा फायदा होणार आहे.

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक असते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मंगल प्रभात लोढा यांनी महिलांसाठी फिरते स्नानगृह असावे यासाठी कार्य सुरू केले होते. या संकल्पनेनुसार कांदिवलीत पहिले फिरते स्नानगृह सुरू करण्यात आले आहे. मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत बुधवारी कांदिवली पूर्व येथे भारतातील पहिल्या अत्याधुनिक फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा >>> अर्थसंकल्पाचा फुगवटा यंदाही कायम? ३६ हजार कोटींपैकी केवळ १८ हजार कोटीच खर्च

यावेळी बोलताना लोढा म्हणाले, ” जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे. यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत. इतर ठिकाणी सुद्धा हा प्रकल्प राबवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कांदिवली विधानसभा क्षेत्रात १२ तासांसाठी हे फिरते स्नानगृह महिलांना वापरता येणार आहे.

हेही वाचा >>> धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून जमीन हडप; सारंगी महाजन यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कसे आहे फिरते स्नानगृह

 – एका बसमध्ये अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले स्नानगृह उभारण्यात आले आहे.

 – या बसमध्ये एकूण ५ स्नानगृहे, शॉवर आहे. २१०० लिटर इतकी पाण्याची क्षमता आहे, बेसिन आणि इतर आवश्यक सुविधा आहेत.

– या बसमध्ये कपडे वाळवण्यासाठी २ ड्रायर मशीनही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी येथे जनरेटर्सचा वापर करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी, तसेच योग्य नियोजनातून सर्वांना स्नानगृहाचा वापर करता यावा यासाठी तेथे महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. – प्रत्येक महिलेला स्नानासाठी ५ ते १० मिनिटे वेळ दिला जाईल आणि वेळ झाल्यावर पाणीपुरवठा बंद होणार आहे.