मुंबई : पाऊस धारांची सांजवेळ, पलीकडे ‘समुद्र बिलोरी ऐना’, मान्यवर कलाकारांचे अप्रतिम काव्यवाचन, बोरकरांच्या आठवणी सांगणारी चित्रफित आणि दाद देते झालेले तुडुंब भरलेल्या सभागृहातील रसिक यांनी ‘बाकीबाब’ कार्यक्रमात रंगत आणली.

‘लोकसत्ता’तर्फे ‘बाकीबाब’ विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त कवी बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर आधारित कार्यकमाचे आयोजन शुक्रवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आले होते. यावेळी बोरकरांच्या एकापेक्षा एक सुंदर कविता कलाकारांनी सादर केल्या. रसिक प्रेक्षक त्यात तल्लीन होत कधी टाळ्यातून दाद देत होते, तर कधी हळवे होत कवितांना मनोमनी सलाम करत होते. तुडुंब भरलेल्या सभागृहात मराठी कवितांवर मन:पूर्वक प्रेम करणाऱ्या रसिकांनी ही काव्ययात्रा अधिक खुलवली.

कवयित्री नीरजा, अभिनेते अविनाश नारकर, अजित भुरे, वैभव मांगले, कवी वैभव जोशी, मिलिंद जोशी, रंगकर्मी चंद्रकांत काळे, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, मधुरा वेलणकर आदींनी बोरकरांच्या कवितांचा गंध आपल्या अभिवाचनातून रसिकांपर्यंत पोहोचवला. वीणा वर्ल्डच्या करिष्मा गोमटे, एम. के. घारे ज्वेलर्सचे उदय घारे, एम. पी. ग्रुपचे मंगेश परुळेकर, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माधुरी टिनी, एन. के. जीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेचे सीए शांतेश वर्टी, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे डॉ. श्रीरंग जोशी यांच्या उपस्थितीत ‘बाकीबाब’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

‘भाषेबद्दल सुरू असणाऱ्या वादविवादात या कार्यक्रमाची गरज होती. कवितांच्या कार्यक्रमांना अशी गर्दी होते आहे हे आश्वासक चित्र आहे,’ असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.

यावेळी नीरजा यांनी बोरकर आपल्या घरी आले असता त्यांच्याकडून रात्रभर ऐकलेल्या कवितांच्या आठवणींना उजाळा दिला तर बोरकर म्हणजे रोमँटिसिझम असे मत अजित भुरे यांनी व्यक्त केले. ‘बोरकर असोत, नसोत निसर्गामध्ये अजूनही त्यांची कविता ऐकू येत राहते.’ अशा वाक्यात वैभव जोशी यांनी बोरकरांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या, तर जीवन सहस्रा डोळ्यांनी पाहणारा माणूस म्हणजे कवी बोरकर, असे वैभव मांगले म्हणाले.

यावेळी कलाकारांनी ‘लावण्यरेखा’, ‘समुद्र बिलोरी ऐना’, ‘प्रार्थना’, ‘ज्ञानदेव गेले तेव्हा…’, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’, ‘फांद्यांमधून चंद्र दिसावा’, ‘जीवन त्यांना कळले हो’, ‘जपानी रमलाची रात्र’, ‘काळी माया’ अशा एकापेक्षा एक बहारदार कविता सादर केल्या. गायक-संगीतकार वैभव जोशी यांनी ‘तू गेल्यावर फिके चांदणे’, ‘तव नयनांचे दल हलले गं’ आणि गायक चंद्रकांत काळे यांनी ‘किती किती तू राहशील सावध’, ‘डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यासवे झुलू’ या कविता सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘बाकीबाब’ विशेषांकाचे संयोजन मुकुंद संगोराम यांनी केले असून कार्यक्रमाची गुंफण आणि निवेदन कुणाल रेगे यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रायोजक

● मुख्य प्रायोजक : पुनित बालन ग्रुप
● सहप्रस्तुती : राज्य मराठी विकास संस्था मराठी भाषा विभाग
● सहप्रायोजक : वीणा वर्ल्ड, डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी गव्हर्नमेंट ऑफ गोवा, सुहाना अंबारी मसाले, लोकमान्य मल्टिपर्पज कोऑप. सोसायटी लिमिटेड आणि एम. के. घारे ज्वेलर्स
● पॉवर्ड बाय : एनकेजीएसबी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि एम पी ग्रुप