मुंबईः पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या वाटचालीत महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. औद्योगिक विस्तार आणि आर्थिक प्रगतीच्या जोरावर एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी पल्ला गाठण्याचा राज्याचा निर्धार आहे. याच अनुषंगाने राज्यातील उद्योगधंद्यांच्या उत्कर्षातील आव्हाने आणि संधींचा वेध घेणारा ‘लोकसत्ता उद्योगचर्चा’ हा कार्यक्रम येत्या सोमवारी पार पडणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.

सिएट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अनंत गोएंका, उद्योग संघटना ‘फिक्की’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि सत्यगिरी समूहाचे सह-अध्यक्ष दिनेश जोशी, स्टरलाइट पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीक अग्रवाल या नामांकित उद्योजकांच्या सहभाग या निमित्ताने होत असलेल्या परिसंवादात असेल.

बरोबरीनेच ‘महाजेन्को’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. तसेच राज्याचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह हे प्रमुख वक्ते असतील. उद्योजक, तज्ज्ञ विश्लेषक, प्रशासन आणि धोरणकर्ते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक वाटचालीसाठी दिशादर्शक ठरणारी ही चर्चा ठरेल. परिसंवादाचा समारोप महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू यांच्या भाषणाने होणार आहे.

देशातील नवउद्यमी (स्टार्टअप्स) परिसंस्थेचे महाराष्ट्र हे देशातील अग्रणी केंद्र आहे. शिक्षित-प्रशिक्षित मनुष्यबळाची मुबलक उपलब्धता, महामार्गांचे विस्तारीत जाळे, विमानतळ आणि बंदरांची सुस्थापित रचना हे राज्याच्या औद्योगिक सामर्थ्याचे मुख्य आधार आहेत. यामुळेच राज्यात नवनवीन प्रकल्प गुंतवणुकीचे करार-मदार लक्षणीय प्रमाणात सुरू आहेत. राज्यात पूर्वापार अनेक उद्योगधंदे स्थिरावले आणि नवनवीन उद्योगांची निरंतर प्रकल्प गुंतवणूक सुरू आहे.

बड्या महानगरांतच नव्हे, तर राज्याच्या इतर भागांतही ते फैलावत असल्याने रोजगाराच्या संधीही सर्वत्र उपलब्ध होत आहेत. तथापि उद्योग विकासासाठी आणखी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या त्रुटी आहेत, उद्योगांची उभारणी करताना कशाला महत्त्व दिले जावे, यासंदर्भात उद्योजकांचेही काही म्हणणे आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएसएमई) उद्योगांची बड्या उद्योगांना पूरक भूमिका अणि त्यांच्या अडचणी दूर करणे ही राज्याच्या सर्वांगीण विकासालाच चालना ठरेल. याबद्दलचे सखोल विचारमंथन म्हणून हे चर्चासत्राचे खास महत्त्व असून, उद्योजक, तज्ज्ञ विश्लेषक यांना सरकार-प्रशासनाशी थेट संवादाचे ते व्यासपीठच ठरेल.

उद्योजक, निवडक वाचकांनाही सहभागाची संधी

राज्यात उद्योगांच्या विकासवाटांशी संबंधित या चर्चासत्रात विविध विषयांवर मंथन होऊ घातले आहे. विचार आणि माहितीच्या या देवाणघेवाणात उद्योजकांना आणि ‘लोकसत्ता’च्या निवडक वाचकांनाही सहभागाची संधी मिळणार आहे. निवडक निमंत्रितांच्या यादीत स्थान मिळवू इच्छिणाऱ्या उद्योजक, वाचकांनी eventloksatta@gmail.com या ई-मेलवर त्यांची सहभागाची इच्छा कळवावी आणि त्यांच्या सहभागाच्या अनुषंगाने कारणही नमूद करावे.

मुख्य प्रायोजक : – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

पॉवर्ड बाय – वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई</p>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.