अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली असून रविवारी गुरूकूंज मोझरी येथे हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे.

मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळाजवळ आंदोलनाला सुरुवात झाली. अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते मोझरीपर्यंत बाईक फेरी काढण्यात आली. या फेरीत शेकडो समर्थक सहभागी झाले होते.

राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ यासह अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला जाणार होता. परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊन बरेच महिने उलटूनही सरकारकडून या आश्‍वासनांची पूर्तता केली जात नाही. म्हणून अन्नत्याग आंदोलन सुरू करीत आहोत, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विमा संरक्षण मिळावे, शेतमजुरांचे आर्थिक हित जपण्याकरिता स्वतंत्र मंडळाची उभारणी व्हावी, लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेतीकामांचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा. हे शक्‍य नसल्यास तेलंगणाच्या धर्तीवर एकरी १० हजार रुपयांची मदत देण्यात यावी. रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय तसेच मेंढी खतालादेखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी, दुधातील भेसळ रोखत गाईच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीसाठी ६० रुपये प्रतिलिटर असा दर निश्‍चित करावा. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरिता ४० रुपये दर होईस्तोवर निर्यात बंदी लागू करू नये, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्यांगाना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही, अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होत आहेत. सरकार जाणीवपूर्वक मुद्द्यांच्या लढाईपासून लोकांना दूर करत आहे. त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही. माझी अंत्ययात्रा निघाली, तरी आम्ही आमच्या मुद्यांपासून दूर होणार नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.