लोकसत्ता टीम
नागपूर: शिंदे-फडणवीस सरकारमुळे ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आरक्षण मिळाले. मात्र राज्यात सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसीसाठी काही केले नाही आणि आता मात्र ओबीसीच्या मतांसाठी ओबीसी मिळावे घेत आहेत अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.




बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात ओबीसी मंत्रालय आणि महाज्योती निर्माण झाले. ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा सुटला. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्यामागे ओबीसी उभा आहे. मात्र निवडणुका बघता ओबीसींची मते मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते मेळावे घेत आहेत.
हेही वाचा… नवरा बाथरूममध्ये जाताच बायको गायब झाली! शेगावमध्ये आक्रीत घडलं!
भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे, त्यात सर्वच पक्षांचा नेता आला तरी त्याला सामावून घेतले जाते.. ४८ लोकसभेच्या आणि विधानसभेच्या २८८ जागा युती म्हणून लढायच्या आहे. त्यामुळे कोणीही पक्षात आला तरी त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला काम देण्यासाठी आमच्याकडे भरपूर जागा आहे.
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विरोधकांकडून विपर्यास करण्यात आला आहे. त्यांचे संपूर्ण भाषण मी ऐकले आहे. त्यांनी भाजप बद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य केले आहे. त्या भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करणे चूक असल्याचे बावनकुळे म्हणाले.