गडचिरोली : तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले तेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. नक्षलवादाचा मोठा प्रभाव असतानाही त्यांनी जिल्हाभर दौरे करून अनेक विकासात्मक कामांना चालना दिली.
त्या तुलनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम असून त्यांच्याकडे केवळ उद्योजकांसाठी वेळ आहे. त्यांच्या ‘स्टील हब’मध्ये गडचिरोलीतील सामान्य नागरिकांना स्थान नाही. अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. २२ जुलै रोजी काँग्रेस लॉलीपॉप आणि चॉकलेट वाटप करून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करणार, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
२२ जुलै रोजी मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते कोनसरी येथील लोह प्रकल्पात विविध युनिटचे उद्घाटन तसेच पायाभरणी करणार आहे. सोबतच एक कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ देखील ते करतील.
तत्पूर्वी २१ जुलै रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीने पत्रकार परिषद घेत पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पालकमंत्री आर. आर.पाटील यांच्या कामगिरीची तुलनात्मक आकडेवारी समोर ठेवत टीका केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला क्रमांक एकचा जिल्हा बनवणार अशी घोषणा करून पालकत्व स्वतःकडे ठेवले. मात्र, त्यांना जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसाठी वेळ नाही. आजपर्यंत त्यांनी केलेल्या दौऱ्यांमध्ये येथील नागरिक, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांच्याशी संवाद साधलेला नाही. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला. वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
डिमांड भरूनही शेतकऱ्यांना मीटर उपलब्ध करून देण्यात येत नाही. कर्जमाफी आणि बोनससाठी त्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागते. घरकुलाचे हप्ते थकले आहेत. रोजगाराच्या नावाखाली युवकांची फसवणूक होत आहे. उद्योगांसाठी जमिनीचे बळजबरी अधिग्रहण करण्यात येत आहे. वृक्षतोडीचा विरोध केल्यास प्रशासनाकडून दडपशाही करण्यात येते. रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. लोहखनिजाच्या बेदरकार वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांचा बळी जात आहे. एसटी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे.
एवढे गंभीर प्रश्न असताना सुद्धा पालकमंत्री याकडे लक्ष देत नाहीत. ते केवळ उद्योजकांच्या निमंत्रणावरच जिल्ह्यात येतात आणि निघून जातात, असा आरोपही काँग्रेसने केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदास मसराम, मनोहर पाटील पोरेटी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसला आर.आर.पाटील यांची आठवण
ज्या काळात नक्षलवाद्यांसह, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वीकारले. त्यांचा दर महिन्याला गडचिरोलीचा दौरा ठरलेला होता. यात सामान्य नागरिकांशी संवाद साधून लहान लहान समस्यांवर ते तोडगा काढत होते.
गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, महिला रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती, तेलंगणा आणि छत्तीसगडला जोडणारे आंतरराज्य पूल, कोडगल, चिचडोह सारखे सिंचन प्रकल्प, पोलीस भरतीत स्थानिकांना प्राधान्य, नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता यासारखे प्रश्न त्यांनी मार्गी लावले. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीकडे बघितल्यास लोह खाण सोडल्यास त्यांनी काहीही केले नाही. पाच वर्षापासून साधा आष्टी ते सिरोंचा रस्ता त्यांना बांधता आला नाही. अशी टीका ब्राह्मणवाडे यांनी केली.