नागपूर : मोसमी पावसाने आधी मुंबईत आणि आता विदर्भात पाय पसरायला सुरुवात केली, पण उपराजधानीला मात्र मोसमी पावसासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे. यंदाच्या उन्हाळ्याभर उन्हाने फिरवलेली पाठ यासाठी कारणीभूत असल्याचे हवामान खात्यातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पश्चिम विदर्भात कालच म्हणजे मंगळवारी मोसमी पावसाने हजेरी लावली. तर पूर्व विदर्भात अद्याप मोसमी पावसाचा सकारात्मक प्रवास नसल्याने पूर्व विदर्भाला मोसमी पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या वाटचालीसाठी जरी पोषक वातावरण असले तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये स्थिती सामान्य नाही. त्यामुळे पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, जून महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वत्र समाधानकारक पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.

हेही वाचा : गडचिरोली : भूमाफियांच्या इशाऱ्यावर बनवला विकास आराखडा, अवैध भूखंडातून माफियांची शेकडो कोटींची कमाई

दरम्यान विदर्भ वगळता इतर भागात मात्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. पेरणींच्या कामाला देखील वेग आला आहे, मराठवाड्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली असून बळीराजा सुखावला आहे. मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रात देखील दमदार पाऊस झाला आहे. मात्र पावसासोबत आलेल्या वादळाने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी सुरू आहे. पश्चिम विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. तर आजदेखील राज्याच्या अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत फटका बसताच एसटी कर्मचाऱ्यांच्या कोविड भत्त्याची आठवण! संघटना म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये “यलो अलर्ट” देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, आणि अकोला जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव परभणी जिल्ह्यांत देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १२ जूनला नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. १३ जूनला लातूर व धाराशिव जिल्ह्यांत वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.