चंद्रपुरमधील इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील रहमत नगर येथे पुराचे पाणी अनेक घरात शिरले आहे. खबरदारी म्हणून २५ घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळा घुटकाळा व सरदार पटेल कन्या शाळा येथे या नागरिकांना आणण्यात आले आहे. तर, इतरांना आणण्याची मोहीम सुरु आहे.
इरई धरणाचे सातही दरवाजे १.० मीटरने उघडण्यात आल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन रहमत नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने बचाव कार्य सुरु केले आहे. येथे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, वैद्यकीय सुविधा मनपामार्फत पुरविण्यात येत आहेत.
विदर्भात पावसाचा रुद्रावतार; चंद्रपुरात इरई नदी कोपली, गडचिरोलीत पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी
याशिवाय, मुसळधार पावसामुळे झरपट नदी दुथडी भरून वाहत आहे. हनुमान खिडकी, पठाणपुरा गेट परिसरात पाणी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचे पठाणपुरा व रहमतनगर येथील दोन्ही ‘सिव्हरेज ट्रिटमेंट प्लांट’ पाण्याखाली आले आहेत.