नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे श्री व संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी भाविकांचे सोन्याचे दागिने चोरी आणि पाकीटमारी करणाऱ्या जोडप्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा १० जून रोजी निघाला. यावेळी गर्दीचा फायदा घेत तीन लाख १६ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी हे गुन्हे उघडकीस येण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला काही सूचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने गुन्हा करण्याची पध्दत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शहरातून सराईत गुन्हेगार मंगेश राखपसरे (२४) आणि त्याची पत्नी निशा (२५) यांना विश्वासात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जावून निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात तसेच त्र्यंबकेश्वर बस स्थानक परिसरातून भाविकांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयितांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिन्यांची मोड करून तयार केलेली एक तोळा वजनाची सोन्याची लगड, नऊ हजार रोख रक्कम आणि चार भ्रमणध्वनी असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राखपसरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरातील सरकारवाडा, मुंबईनाका आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.