‘लोकरंग’मधील (१५ एप्रिल) ‘समकालीन राजकीय संस्कृतीचं समाजशास्त्र’ हा राहुल सरवटे यांचा कमालीचा अभ्यासपूर्ण व पूर्वस्मृतींना उजाळा देणारा लेख वाचला. या लेखात आचार्य अत्रे व बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख आला आहे. प्र. के. अत्रे यांचा शाब्दिक फटकारा हिणवणारा कमी व हसवणारा जास्त होता. एकदा गिरगावात गायवाडीला त्यांचे भाषण आयोजित केले होते. संध्याकाळी सातची वेळ दिली होती, त्यामुळे गर्दी होणार म्हणून श्रोते सहा वाजल्यापासूनच सभेच्या ठिकाणी जमा झाले होते. अत्रे नऊ वाजता सभामंडपी पोहोचताच एक कल्लोळ माजला. त्यांनी आयोजकांना विचारले तेव्हा सांगण्यात आले की तीन तास श्रोते खोळंबून आहेत. अत्रेंनी हातात माइक घेतला व एवढेच हसत म्हणाले, ‘‘मला उशीर झाला म्हणून क्षमा करा. पण एक गोष्ट मला अजूनही कळत नाही, गायवाडीत लवकर यायला मी काही बैल आहे काय?’’ या कोपरखळीने सारा श्रोतृवृंद शांत झाला. हा केवळ प्रसंगावधानाचा भाग होता. त्यात अहंकाराची दरुगधी नव्हती तर निखळ विनोदाची मुलायम झालर होती. संस्कृती हा माणसाला लाभलेला सामाजिक वारसा आहे. दुर्दैवाने हा वारसा हळूहळू हरवत चालला आहे. केवळ एकमेकांचे केस कसे उपटता येतील याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. अर्थात, आजच्या राजकारणी मंडळींकडून साहित्याची किंवा विद्वत्ताप्रचुर भाषणाची अपेक्षा करणे चुकीचे असले तरी विरोधकांवर शब्दसंहार करताना साप, मुंगुस, कुत्री, मांजरी, चित्ता, वाघ यांना मधे आणून मुक्या प्राण्यांची वासलात कशाला? - सूर्यकांत भोसले, मुंबई. प्रेक्षकांनीच परखड भूमिका घ्यावी! ‘लोकरंग’मधील संजय मोने यांच्या ‘मी जिप्सी..’ या सदरातील ‘कुछ मटेरियल नहीं इस में यार!’ हा लेख (१५ एप्रिल) वाचला. हा लेख म्हणजे टीव्ही वाहिन्यांची घेतलेली झाडाझडतीच! निर्थक गोष्टींना अतिरिक्त महत्त्व व कोणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठी या वाहिन्या आहेत का? प्रेक्षकांनीच या संदर्भात परखड भूमिका घेतली व अशा कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला तर बरेच काही होऊ शकते. परंतु निर्थक चर्चा, फालतू वादविवाद, अभिरुचीहीन कार्यक्रमांना जर प्रेक्षकवर्ग मिळत आहे तर असेच कार्यक्रम पाहावे लागणार आहेत. सारे काही आर्थिक गोष्टींभोवतीच फिरत असल्याने यावर बोलण्यासारखे काही नाही. - प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक