पश्चिम बंगाल निवडणुकीला वर्षभरापेक्षाही कमी काळ शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. मोदींनी पश्चिम बंगाल प्रशासनावर हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अराजकता वाढवत असल्याचा आरोप केला आहे. “निर्मम सरकार (निर्दयी सरकार) पासून मुक्तता मिळवण्यासाठी लोक तळमळत आहेत”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. उत्तर बंगालच्या अलीपुरद्वार इथे पाईप गॅस प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. “मुर्शिदाबाद आणि मलाद इथे काय घडल ते पाहा, ती सरकारच्या क्रूरतेची स्पष्ट उदाहरणं आहेत. तुष्टीकरणाच्या नावाखाली अराजकता वाढवण्यामध्ये बंगाल सरकारने हातभार लावला. कल्पना करा की, सत्ताधारी पक्षाचे सदस्य घरं टिपून त्यांना आग लावतात आणि पोलिसही तिथेच उभे राहतात, मात्र काहीच करत नाहीत”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केली.

“आज पश्चिम बंगाल अनेक संकटांना तोंड देत आहे. लोकांना ‘निर्मम सरकार’ नको आहे. त्यांना बदल आणि सुशासन हवे आहे, म्हणूनच संपूर्ण बंगाल म्हणत आहे की त्यांना आता क्रूरता आणि भ्रष्टाचार नको आहे”, असे म्हणत त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर तोफ डागली आहे. यावर बोलताना त्यांनी “बांगलार मातीर चित्कार, चाय ना आर निर्मळ सरकार (बंगालची भूमी ओरडत आहे, आम्हाला हे निर्दयी सरकार नको आहे) अशी बंगाली भाषेत टीका केली आहे.

एप्रिलमध्ये वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरुद्धच्या निदर्शनांनंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समसेरगंज, सुती आणि धुलियान या भागांत हिंसक संघर्ष झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच राज्य दौरा होता. या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते.

पश्चिम बंगालमधील पाच मोठी संकटं

या सभेत बोलताना मोदींनी तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत बंगालला भेडसावणाऱ्या पाच मोठ्या संकटांची यादीदेखील लोकांसमोर मांडली. “पहिले म्हणजे समाजाच्या रचनेला फाडून खाणारा हिंसाचार आणि अराजकता. दुसरे म्हणजे माता आणि बहिणींमध्ये वाढती असुरक्षिततेची भावना. ही भावना त्यांच्याविरुद्ध झालेल्या भयानक गुन्ह्यांमुळे आणखी वाढली आहे. तिसरे संकट म्हणजे बेरोजगारी आणि नोकरीच्या संधींच्या अभावामुळे तरुणांमध्ये निराशा, तर चौथे संकट म्हणजे राज्याच्या व्यवस्थेचा नाश करणारा आणि राज्य सरकारवरील जनतेचा विश्वास कमी करणारा भ्रष्टाचार.” “पाचवे संकट हे सत्ताधारी पक्षाच्या स्वार्थी राजकारणातून उद्भवले आहे. त्यांनी गरिबांचे हक्क हिरावून घेतले. सभेत या पाच संकटांची यादी जाहीर करत मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर अचूक निशाणा साधला. एकूणच अशाप्रकारे मुद्देसूद टीका केल्यामुळे येत्या काळात भाजपाचे नेते तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत आणखी पेटून उठतील असा अंदाज आहे. मुर्शिदाबाद आणि मालदा इथल्या घटना ही तृणमूल काँग्रेस सरकारच्या क्रूरतेची आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशाची स्पष्ट उदाहरणे आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले.

शालेय नोकऱ्या घोटाळ्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २५ हजार ७५३ नियुक्त्या रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याबाबतही ममता बॅनर्जी सरकारवर मोदींनी निशाणा साधला. ते म्हणाले, “हे केवळ काही हजार शिक्षकांच्या आयुष्याचं नुकसान नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था बिघडत चालल्याचं लक्षण आहे. अजूनही तृणमूल काँग्रेस आपल्या चुका मान्य करण्यास नकार देत आहे, उलट ते न्यायालये आणि न्यायव्यवस्थेला दोष देत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या घोटाळेबाजांनी गरीब कुटुंबांच्या शेकडो मुलांना अंधाराच्या गर्तेत ढकलले आहे.”

दिल्लीत झालेल्या निती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत पश्चिम बंगाल सरकारच्या अनुपस्थितीबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली. “बंगाल सरकारने इतक्या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी न होणे दुर्दैवी आहे. यावरून विकासाप्रती त्यांची गांभीर्यता दिसून येते आणि त्यांना केवळ राजकारणात सहभागी होण्यातच अधिक रस आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी मोदींनी बंगाल सरकारवर केंद्र सरकारच्या योजनांमध्ये अडथळा आणल्याचाही आरोप केला. त्यांनी असा दावा केला की, पश्चिम बंगालमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ४,००० किमी ग्रामीण रस्त्यांपैकी आतापर्यंत ४०० किमीपेक्षाही कमी रस्तेबांधणी झाली आहे.

अलीपुरद्वार प्रदेशातील आदिवासी समुदायांच्या गरजांकडे दुर्लक्ष केल्याबद्दलही त्यांनी तृणमूल काँग्रेस सरकारला धारेवर धरले. “आदिवासी कुटुंबांना उन्नत करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षण, आरोग्य सेवा, गृहनिर्माण आणि उपजीविकेवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान जनमान योजना सुरू केली. मात्र, दुर्दैवाने तृणमूल काँग्रेस सरकारने राज्यात ही योजना अद्याप लागू केलेली नाही,” असे मोदींनी लोकांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी लष्करी कारवाईचा संदर्भ देताना मोदी म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांकडून भारत मोठी किंमत वसूल करत राहील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता मी ‘सिंदूर खेळा’(दुर्गापूजेच्या शेवटच्या दिवशी बंगाली महिला पार पाडत असलेली परंपरा) च्या पवित्र भूमीवर उभा आहे. बंगालच्या भूमीवरून… १४० कोटी भारतीयांच्या वतीने जाहीर करतो की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही”, असा इशाराही पंतप्रधानांनी यावेळी दिला. एकंदरच आगामी निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये देशोधडीला लावण्यासाठी भाजपा जय्यत तयारी करत असल्याचे यावरून दिसून येते.