जयंत पाटील यांनी फुकटात जे मिळवलं आहे पचवावं आणि मग आम्हाला सल्ले द्यावेत आमची चिंता करुन नये एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आम्ही राज्यात काम करतोच आहोत असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हे सरकार पडेल असं भाजपाचे नेते एक वर्षांपासून म्हणत आहेत. भाजपाची आणखी चार वर्षे हेच म्हणण्यात जातील असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी त्यांना उत्तर देत जे फुकटचं मिळालं आहे ते आधी पचवा असा उपरोधिक टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनाही लगावला टोला
नितीश कुमार यांनी बिहारचा पॅटर्न महाराष्ट्रातही राबवावा असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता संजय राऊत यांना सल्ला देण्यासाठी दिल्लीत पाठवलं गेलं पाहिजे. खरंतर अमेरिकेतही त्यांच्या सल्ल्याची गरज होती असं म्हणत टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
महाविकास आघाडीचं सरकार दोन महिनेही टिकणार नाही असं जेव्हा आम्ही शपथ घेतली तेव्हा भाजपाचे नेते म्हणत होते. आमच्या सरकारला वर्ष पूर्ण झालं. आताही भाजपाचे लोक हेच म्हणत आहेत की सरकार पडेल. मला खात्री आहे की उरलेली चार वर्षे हेच म्हणण्यात जातील याची मला खात्री आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 5:43 pm