पुणे : देशाच्या सरासरी तापमानात १९०१ ते २०१८ या काळात सरासरी ०.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. तापमान वाढीमुळे हिंदी महासागराच्या पाणी पातळीत दरवर्षी सुमारे ३.३ मिली मीटरने वाढ होत आहे. मोसमी पावसात अनियमितात वाढून एकीकडे मुसळधार पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर दुसरीकडे पाऊस न पडणारे दुष्काळी पट्टेही वाढले आहेत. 

हेही वाचा >>> पुणे: लॅम्बोर्गिनीच्या धडकेने श्वानाचा मृत्यू, फर्ग्युसन रस्त्यावरील घटना

राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तरात ही माहिती दिली. देशाच्या सरासरी तापमानात १९०१ ते २०१८ या काळात ०.७ अंश सेल्सिअने वाढ झाली आहे. १९५० ते २०१५ या काळात मोसमी पावसात अनियमितता वाढली आहे. एका दिवसांत १५० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे पावसाचे दिवस वाढले आहेत. अतिवृष्टी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. दुसरीकडे १९५१ ते २०१५ दरम्यान, भारतातील दुष्काळाची वारंवारता वाढली आहे. पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी पट्टे वाढले आहेत. एकूण पर्यावरण बदल, जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून हिंद महासागरात पाणी पातळीत गेल्या अडीच दशकांत, १९९३ ते २०१७ या काळात दर वर्षी ३.३ मिलीमीटरने वाढ झाली.

हेही वाचा >>> संभाजी भिंडेंविरुद्ध तुषार गांधींकडून डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार

जागतिक हवामान बदलांचा परिणाम म्हणून १९९८ ते २०१८ या काळात मोसमी पावसाच्या हंगामानंतर अरबी समुद्रात तयार होणाऱ्या तीव्र चक्रीवादळांची वारंवारिताही वाढली आहे, असे रिजिजू यांनी नमूद केले. भारतीय हवामान विभागाने हवामानाचा परिणामकारक अंदाज जारी करणे सुरू केले आहे. हवामानातील गंभीर बदल, बदलांमुळे जनजीवनावर होणाऱ्या परिणामांचा तपशील जाहीर केला जात आहे. सर्वसामान्य लोकांसाठी गंभीर हवामान बदलाच्या काळात काय करावे आणि करू नये, याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत. ई-मेल, मोबइल संचावर संदेश पाठविले जात आहेत. चक्रीवादळ, उष्णतेची लाट, गडगडाटी वादळ आणि अतिवृष्टीच्या काळात यशस्वीपणे अंमलबजावणी केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.